T20 Mumbai 2026 Final Controversy : टी-20 मुंबई लीग 2026 च्या अंतिम सामन्यात क्रिकेटसोबतच भावना, तणाव, वाद आणि थरार यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या फायनलमध्ये गतविजेता मराठा रॉयल्स आणि ARCS अंधेरी आमनेसामने होते. मात्र सामना संपल्यानंतर सर्वाधिक चर्चा ती मैदानावरील वादाची आणि विजयानंतर जर्सी हवेत फिरवत केलेल्या जल्लोषाची झाली.
शेवटच्या षटकात रंगला थरार, सलग दुसऱ्यांदा मराठा रॉयल्स चॅम्पियन (Maratha Royals Champions 2nd Time)
ARCS अंधेरीला विजयासाठी अखेरच्या षटकात 14 धावांची गरज होती. सामना कोणत्याही बाजूला झुकू शकत होता. पण मराठा रॉयल्सचा गोलंदाज रोहन राजे दबावाखालीही शांत राहिला. त्याने शेवटच्या षटकात केवळ 5 धावा दिल्या आणि आपल्या संघाला 8 धावांनी विजय मिळवून दिला. विजय निश्चित होताच रोहन राजेने आनंदाच्या भरात आपली जर्सी काढून हवेत फिरवत मैदानभर धाव घेतली. त्याचा हा जल्लोष पाहून इतर खेळाडूही त्याच्यात सहभागी झाले. वानखेडे स्टेडियममध्ये एकच जल्लोष उसळला. या विजयासह मराठा रॉयल्सने सलग दुसऱ्यांदा टी-20 मुंबई लीगचे विजेतेपद पटकावले. गतवर्षीचा किताब जिंकणाऱ्या संघाने यंदाही वर्चस्व कायम ठेवत ट्रॉफीवर पुन्हा नाव कोरले.
Maratha Royals won the T20 Mumbai League final. Siddhesh Lad’s team, whose father Dinesh Lad coach of Rohit Sharma, won by 8 runs.
Defending 154 runs, Rohan Raje won the match with his bowling in the last over. After the victory, he celebrated by taking off his T-shirt.🔥❤️ pic.twitter.com/nDvrbNVmrY
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) June 13, 2026
अर्जुन तेंडुलकरची प्रभावी गोलंदाजी
ARCS अंधेरीकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने 4 षटकांत 36 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. अर्जुनने सचिन मधुकर यादव आणि अयाज खान यांना बाद करत मराठा रॉयल्सला धक्के दिले. तरीही मराठा रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 154 धावा उभारल्या. संघाकडून चिन्मय राजेश सुतार याने 52 चेंडूत 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
सामन्यात वाद का पेटला?
ARCS अंधेरीचा डाव सुरू असताना फायनल सामन्याचा तणाव खेळाडूंवर स्पष्टपणे दिसत होता. लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला निर्णायक क्षणी मोठे धक्के बसले. 17.5 व्या षटकात तुषार देशपांडेने शिवम दुबेचा बळी घेतला, तर 18.3 व्या षटकात इरफान उमैरने गौरव जठारला बाद केले. यानंतर मैदानावर अचानक वातावरण तापले. बाद झाल्यानंतर गौरव आणि तुषार देशपांडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. काही क्षणांतच हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली. मैदानावरील इतर खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच ARCS अंधेरीचा कर्णधार शिवम दुबे डगआउटमधून धावत मैदानात आला. त्याने गौरव जठारला बाजूला नेत दोघांना वेगळे केले आणि अखेर हा वाद शांत झाला.
The Last Over Drama During the Mumbai T20 League Final 🔥🥶 pic.twitter.com/U25N1eSdsE
— TEJASH 🚩 (@LoyleRohitFan) June 14, 2026
फायनलमध्ये सर्व काही पाहायला मिळाले!
या फायनलमध्ये प्रेक्षकांना फक्त क्रिकेटच नाही तर शेवटच्या षटकाचा थरार, खेळाडूंचा आक्रमकपणा, मैदानावरील वाद आणि विजयानंतरचा जल्लोष असे सर्व काही पाहायला मिळाले. मराठा रॉयल्सने पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला