नीट पेपरफुटी प्रकरणी आता क्रेंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, या साठी हजारो विद्यार्थ्यांनी संसद भवनाकडे मोर्चा काढला होता. या विद्यार्थ्यांवर आणि आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. यानंतर देशभरातून या घटनेवर संतात व्यक्त केला गेला. दिल्ली पोलिसांना अनेक टीकांचा सामना करावा लागला. यानंतर अनेकांनी विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला. या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळाला. अनेक सेलिब्रिटींनी याला पाठिंबा दर्शवत पोस्ट शेअर केल्या. अनेक मराठी कलाकारांनीही या संदर्भात पोस्ट शेअर केल्या. आता यातच मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी या आंदोलनाविरोधात एक पोस्ट शेअर केली आहे.
रवी जाधव यांनी सोशल मीडियाावर पोस्ट शेअर करत आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की “विद्यार्थ्यांनी उचललेलं हे पाऊल अत्यंत संयमी, शांततापूर्ण आणि जबाबदारीचं आहे. शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ, प्रामाणिकपणा आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची जिद्द पाहून मनापासून अभिमान वाटतो. अशी जागरूक आणि धाडसी तरुण पिढी भारताचं भविष्य अधिक सक्षम करेल, याची खात्री वाटते. हा विषय विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेचा आहे. त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सकारात्मकपणे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यांच्या प्रयत्नांचं श्रेय त्यांनाच मिळायला हवं. सरकार आणि संबंधित यंत्रणा योग्य तो निर्णय घेऊन शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि मजबूत करतील, अशी अपेक्षा आहे.”
“यामुळे विद्यार्थ्यांचं आणि देशाचं—दोघांचंही भलं होईल. शिक्षण ही केवळ गरज नसून देशाच्या प्रगतीची सर्वात मोठी ताकद आहे. ते प्रत्येक तरुणाचं स्वप्न, अभिमान आणि जीवनशैली बनावं. अशी वेळ यावी की जगभरातून विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी यावेत आणि भारत ज्ञान, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं जागतिक केंद्र म्हणून ओळखला जावा. या लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून शुभेच्छा. तुमचा आवाज शिक्षणासाठी आहे, भविष्यासाठी आहे आणि देशासाठी आहे. देव तुमच्या प्रयत्नांना यश देवो.” असे ते म्हणाले.