मुंबई : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करत आहोतअसं म्हटलं. या निर्णयासाठी राज्य सरकारनं 36585 कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामाध्यमातून 56 लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाक शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. यावेळी सहकारमंत्र्यांनी विविध जिल्हा बँकांच्या 553 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली.
बाबासाहेब पाटील म्हणाले की, लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात येत आहे. ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करुन त्यांना नव्या जोमानं शेती करण्यासाठी राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यापूर्वी कर्जाफी झाल्यास त्याला कर्ज मिळत नव्हतं. आता कर्जमाफी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, अशी सक्ती राज्य सरकारनं केलं आहे, असं बाबासाहेब पाटील म्हणाले.
कर्जमाफीसाठी 40980 कोटींची तरतूद
महाराष्ट्रात एवढी मोठी शेतकरी कर्जमाफी झाली नव्हती. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येईल. 36585 कोटी आणि 12 लाख शेतकऱ्यांचा 4395 कोटी मिळून 40980 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे, अशी माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
राज्य सरकारकडून आज प्रातिनिधिक पद्धतीनं कर्जमाफीतील पात्र असलेल्या 553 शेतकऱ्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्हा बँक 58 शेतकरी, लातूर जिल्हा बँक 133, नागपूर जिल्हा बँक 16, पुणे जिल्हा बँक 85 शेतकरी, सातारा जिल्हा बँक 38 आणि ठाणे जिल्हा बँक 182 शेतकरी अशा 553 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचं 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. यादी अपलोडिंग सुरु असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली.
राज्य सरकारकडून पहिल्यांदा 5 जुलै पर्यंत यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, 2019 च्या कर्जमाफीच्या यादीतील शेतकऱ्यांची वाढ झाल्यानं वेळ लागतोय. शेती बाह्य उत्पादनातून इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा नाही. इन्कम टॅक्सचा डेटा मिळाल्यानंतर लगेचच प्रक्रिया पूर्ण होईल, असं सहकार विभागाकडून सांगण्यात आलं.
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार त्या शेतकऱ्यांची संख्या 23.63 लाख इतकी आहे. साधारणपणे 32 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल.
कर्जमाफीची प्रक्रिया कशी, शेतकऱ्यांनी काय करायचं?
शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावं. त्यावेळी कर्जाची रक्कम बरोबर आहे का ते पाहावं. आधार प्रमाणीकरण झालं त्यांचा प्रतिसाद आमच्याकडे येईल. त्याबाबतची पुढील प्रक्रिया राबवली जाईल.