भारतीय संघाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. आता भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेला आता दोन दिवस शिल्लक आहेत. भारतीय संघ ही मालिका जिंकून पुन्हा एकदा टी-20 फॉरमेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर श्रेयस अय्यरलाही झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकायची असणार कारण त्याच्या नेतृत्त्वात एकही सामना जिंकण्यात यश आलेले नाही. भारतीय संघ मालिका जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील पण आता झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने मॅचपूर्वी एक विधान केले आहे. सिकंदर रझाच्या विधानाची आता जोरदार चर्चा सुरु आहे.
झिम्बाब्वेचा टी-20 कर्णधार सिकंदर रझाने भारत एक प्रबळ दावेदार असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्याने जोर देऊन सांगितले की, “आगामी तीन सामन्यांची टी-20 मालिका अटीतटीची होईल आणि दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी असेल.” भारत-झिम्बाब्वे मालिका गुरुवारी सुरू होत असून, आयर्लंड आणि इंग्लंडच्या कठीण व्हाईट-बॉल दौऱ्यावरून परतणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध यजमान संघ संधी साधण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध टी- 20 मालिका 0-2 ने गमावली, त्यानंतर नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी- 20 मालिकेत 0-4 ने पराभव पत्करला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील पाहुण्या संघाने एकदिवसीय मालिकाही 1-2 ने गमावली.
Another exciting challenge awaits Team India! 🇮🇳
Zimbabwe skipper Sikandar Raza is excited for the upcoming series against India and believes fans are in for an entertaining contest! 👊🔥#ZIMvIND pic.twitter.com/6iyXDzZbLn
— Star Sports (@StarSportsIndia) July 21, 2026
रझा स्टार स्पोर्ट्सला म्हणाला, “या मालिकेत दोन्ही देशांना समान संधी असेल. पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो की झिम्बाब्वे खूप सातत्यपूर्ण आणि मनोरंजक क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे मी निश्चितपणे म्हणू शकतो की ही मालिका खूप मनोरंजक असेल.” फेब्रुवारीमध्ये कोलंबो येथे झालेल्या आयसीसी टी- 20 विश्वचषकात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत करून खळबळ उडवून दिली होती आणि ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढले होते. त्यांनी यावर्षी श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धही विजय मिळवला आहे.
136 टी- 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले अनुभवी अष्टपैलू खेळाडू रझा म्हणाले, “जिंकू किंवा हरू, दोन्ही देशांना मालिका जिंकण्याची समान संधी आहे. भारतीय क्रिकेट बदलाच्या टप्प्यातून जात आहे, ज्यामुळे मालिका रंजक होईल. होय, भारत बदलाच्या टप्प्यातून जात आहे आणि काही प्रमाणात झिम्बाब्वेमध्येही काही बदल दिसून येतील. मला ही मालिका एकतर्फी वाटत नाही.” दुसरा आणि तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना अनुक्रमे 25 आणि 26 जुलै रोजी त्याच मैदानावर खेळला जाईल.