..तर सरकारला अब्रू वाचवता आली असती..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सेलिब्रिटींचा निशाणा – Marathi News | Ranvir shorey sonu sood bhumi pednekar reacts on cjp protest jantar mantar abhijeet dipke sansad march


सोनू सूद, रणवीर शौरी आणि भूमी पेडणेकरImage Credit source: Instagram

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात अखेर विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध सुटला. सोमवारी असंख्य आंदोलक संसद भवनाच्या दिशेने निघाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले होते. या संपूर्ण प्रकारावर विविध स्तरांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेता सोनू सूदने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘आपल्या विद्यार्थ्यांना लाठ्या नाही, तर मिठी मारणारे हात हवे आहेत.’ तर अभिनेता रणवीर शौरीने सोशल मीडियावर म्हटलंय, ‘मंत्र्यांनी खूप आधीच राजीनामा द्यायला हवं होतं. तसं केलं असतं तर सरकारला आपली इज्जत वाचवता आली असती आणि कदाचित तेव्हा सरकारला जबाबदारही धरता आलं असतं. आता मला वाटत नाही की विरोधी पक्षाला फायदा करून दिल्याशिवाय किंवा स्वत:साठी अडचणी निर्माण केल्याशिवाय सरकार यातून बाहेर पडू शकेल.’

भूमी पेडणेकरची पोस्ट-

अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित या आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. आज आपण हिंसेची असंख्य दृश्ये पाहिली. आपल्या देशातील तरुण या आंदोलनात हिंसेचा मार्ग अवलंबणार नाहीत आणि आपल्या मार्गापासून विचलित होणार नाहीत, हे सुनिश्चित करणं आपली जबाबदारी आहे. लोकशाही ही संवाद आणि चर्चेवर आधारित असते. असुरक्षित आणि वंचित पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हाच कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. आपण हा विश्वास तुटू देऊ शकत नाही’, असं तिने लिहिलं आहे.

रणवीर शौरीची पोस्ट-

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यांचा आवाज स्पष्ट आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे, असं रितेश-जिनिलियाने म्हटलंय. ‘आम्ही आपल्या देशातील तरुणांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज बुलंद, स्पष्ट आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे. ते आपल्या लोकशाहीचा प्राण आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊयात, त्यांना पाठिंबा देऊयात आणि त्यांना सक्षम करुयात. आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नंच आपल्याला इच्छित असलेल्या भारताला घडवतील,’ अशी पोस्ट रितेश आणि जिनिलिया यांनी मिळून लिहिली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *