अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटीलही तिथे होते. त्यावरुन राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्क, अंदाज, चर्चा सुरु आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना न सांगता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, म्हणून त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आज पत्रकारांनी सुनील तटकरे यांना त्या संदर्भात विचारलं. मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवर सुनेत्रा पवार नाराज असल्याच कळतय, त्यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. “दोन भाग आहेत एकतर जयंत पाटील आणि आमची वर्षा बंगल्यावर भेट झाली नाही. जयंत पाटील वर्षा बंगल्यावर गेले त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील अपात्र नगराध्यक्षावर चर्चा करण्यासाठी गेले असं त्यांनी सांगितलय”
“मी आणि प्रफुल पटेल, मी गेल्या आठवड्यात त्यांची वेळ मागितली होती. संसदेच अधिवेशन सुरु होण्यापूर्वी यापूर्वी महाराष्ट्रात प्रथा होती की, खासदारांना बोलावावं. दिल्ली मध्ये असलेले काही प्रश्न असतील तर त्याचा पाठपुरावा करावा. माझे काही प्रस्ताव आहेत, जे राज्य सरकारकडून दिल्लीकडे जाणार आहेत. त्यात दापोली पर्यटनाचा विषय आहे. त्या खात्याचे मंत्री शेखावत आहे. मी अमितभाई शाह यांच्यामार्फत त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. इतरही काही प्रस्ताव आहेत, त्यासाठी वेळ मागितलेला. मुख्यमंत्री त्यावेळी उपलब्ध होते, म्हणून आम्हाला बोलावलं” असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं.
त्या बद्दल जे सांगायचय ते सांगितलं
“मी कालच सांगितलं की, राजकीय भेट असती तर नक्कीच वहिनीनी सांगितलं असतं. पण ती भेट राजकीय नव्हती. काल कोर कमिटीची बैठक झाली. अनेक बाबींवर चर्चा केली. एसआयआरवर चर्चा केली, स्वर्गीय दादांची 22 तारखेला जयंती आहे, त्यावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्या बद्दल जे सांगायचय ते सांगितलं. त्याच्यामुळे वहिनी आमच्या नेत्या आहेत, जो आदर अजिततदादांबद्दल मनात आहे, तोच आदर वहिनींबद्दल आमच्या मनात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष नेटाने वाटचाल करतोय” असं सुनील तटकरे म्हणाले.