देवाभाऊंनी देशाचे नेतृत्व करावे… आता महायुतीमधूनही सूर, या मंत्र्याचे पांडुरंगाला साकडे, मुख्यमंत्री पदासाठी कुणाची मोर्चेबांधणी? – Marathi News | Devendra Fadnavis should lead the nation such voices are now emerging from within the Mahayuti as well this leader statement has caused a stir who is mobilizing support for the Chief Ministers post


देवेंद्र फडणवीस, दत्तात्रय भरणे

Dattatray Bharne on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा वातावरण तापले आहे. विरोधकांकडून विशेषता उद्धव ठाकरे गटाकूडन फडणवीस हे लवकरच देशाचे नेतृत्व करतील. ते देशाचे पंतप्रधान होतील असा दावा करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनी तर गेल्या काही दिवसात अनेकदा असे वक्तव्य करत फडणवीसांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आता फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची घाई केवळ विरोधकांनाच नाही तर महायुतीमधील नेत्यांनाही झाल्याचे दिसते. देवाभाऊंनी देशाचे नेतृत्व करावे असे वक्तव्य कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. यामुळे राजकीय गोटात काही मोठ्या घडामोडी घडत आहेत काय? अशी चर्चा होत आहे.

थेट पांडुरंगालाच साकडे

हा महाराष्ट्र खूप दिवसापासून दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे. 25 तारखेला आषढी आहे. आपण पांडुरंगाकडे इतकंच साकडं घालूयात. योग्यवेळी आमच्या देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी शेतकऱ्यांच्या वतीने साकडं घालतो, असे दत्तात्रय भरणे म्हणाले. आतापर्यंत विरोधक फडणवीस हे दिल्लीत जातील असे म्हणत होते. आता महायुतीमधील मंत्री सुद्धा फडणवीस देशाचे नेतृत्व करणार असल्याचे संकेत देत आहेत.

मुख्यमंत्री पदासाठी व्हॅकन्सी आहे का?

मुख्यमंत्री पदासाठी व्हॅकन्सी आहे का? असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशा कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मी मुख्यमंत्री असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटायचं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे. हे सहाजिक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना असतात. आमचा अजेंडा हा मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवणे हा नाही. महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे. राज्याचा विकास झाला पाहिजे हा अजेंडा आहे. आमची विचारधारांची युती झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत. यामुळे महायुतीत तुला काय मिळेल, मला काय मिळेल अशी आमची वृत्ती नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

देवाची इच्छा, सुधीरभाऊंनी बाहेर काढला पत्ता

दरम्यान पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मनातील एक इच्छा व्यक्त केली. मंत्रिपद कधी मिळणार असा सवाल त्यांना विचारला असता, ‘देवाची इच्छा’ असे सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले. यापूर्वी सुद्धा त्यांनी मंत्रि‍पदावरून नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांनी हा निर्णय कुणाच्या कोर्टात प्रलंबित आहे हे संकेतातून स्पष्ट केले. आता देवाभाऊ केव्हा निर्णय घेतात, याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *