Ujani Dam : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. राज्याचे जलसंधारण व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सीना नदीला पाणी सोडण्याबाबतचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. उद्यापासून म्हणजे 15 जुलैपासून उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळं पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची करपू लागलेली पिकं देखील या पाण्यामुळ वाचणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उजनी धरणाचं पाणी सीना न दीत सोडण्यात याव, अशी मागणी शेतकरी करत होते. अखेर या मागणीला यश आलं.

उजनीतून सीना नदीत पाणी सोडण्यासंदर्भात आदेश प्राप्त, अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती
दरम्यान, उजनी धरणातून पाणी कधी सुटणार? याबाबत एबीपी माझाने जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यासंदर्भात आम्हाला आदेश प्राप्त झाले आहेत. त्या दृष्टीने आम्ही पुढची कार्यवाही सुरु केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणत: 33 टक्क्यांचे पुढे धरणातील पाणीसाठा गेल्यास आपण नदीला, कालव्यांना, बोगद्याद्वारे पाणी सोडू शकतो. पण सध्या एल निनोची परिस्थिती आहे. पावसाचं प्रमाण कमी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या स्थिती देखील आण्हाला आलेल्या आदेशाप्रमाणे पाणी सोडण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
उजनी धरणाचं पाणी सीना नदीला सुटावं या मागणीसाठी शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र आणि भाजपचे नेते रणजितसिंह शिंदे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पाठपुरावा केला होता. या सगळ्या नेत्यांच्या मागणीला यश आलं आहे. मंत्री विखे पाटील यांनी सीना नदीत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. 15 जुलैपासून नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.
सीना नदीत पाणी सोडण्याचा निर्णय, रणजितसिंह शिंदेंनी मानले विखे पाटलांसह पालकमंत्री गोरेंचे आभार
दरम्यान, भाजप नेते रणजितसिंह शिंदे यांनी आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली होती. याबाबत त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, पाण्यावाचून सीना नदी काठच्या शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना आता पाण्याची सक्त गरज आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर विखे पाटील यांनी सोलापूर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री. चोपडे साहेब यांना फोनवरुन तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती रणजितसिंह शिंदे यांनी दिली. त्यामुळं पुढच्या एक ते दोन दिवसात पाणी सुटणार असल्याचे शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी मंत्री विखे पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती : अभिजीत पाटील
उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडावं यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी एबीपी माझाला दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून याबाबत मागणी केली होती. महापुराच्या काळात आम्हाला पाण्याची आवश्यकता नव्हती त्यावेळी नको तेवढे पाणी दिले. आता आम्हाला पाण्याची गरज आहे. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून देखील याबाबत निवदेन दिले होते अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली. पाण्यावाचून पिकं जळू लागली आहे. त्यामुळ पाणी सोडावं अशी मागणी केल्याचे पाटील म्हणाले. पाणी जर सोडले नाहीतर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिला होता असे अभिजीत पाटील म्हणाले. पण आता सरकारने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मंत्री विखे पाटील यांचे आभारी असल्याचे पाटील म्हणाले.

करपत चाललेल्या पिकांना संजीवनी मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार, कालव्यातून 2 हजार 500 क्युसेक्स, भीमा सीना बोगद्यातून सीना नदीत 950 क्युसेक्स, सीना माढा सिंचन योजनेतून 222 क्युसेक्स पाणी लाभक्षेत्रातील शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पाणी पातळी कमालीची घटली असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची उभी पिके जळत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. असा स्थितीत उजनी धरणात सध्या 51 टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, धरणातून सीना – माढा उपसा सिंचन योजना, उजवा व डावा कालवा, आणि भीमा – सीना जोड कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पाण्यामुळं करपत चाललेल्या पिकांना संजीवनी मिळणार आहे.
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया