IND vs ENG : पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला नमवलं, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी
Image Credit source: BCCI
वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडला नमवलं. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 47.5 षटकात सर्व गडी गमवून 258 धावा केल्या आणि विजयासाठी 259 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर मालिका खिशात घालेल. यापूर्वी भारताने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका 4-0 ने गमावली होती. या विजयामुळे भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल गेल्याने क्रीडाप्रेमींची चिंता व्यक्त केली आहे.
भारताचा डाव
इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 259 धावांचं आव्हान गाठताना भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. रोहित शर्माने 21 चेंडूंचा सामना केला आणि 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीकडूनही अपेक्षाभंग झाला. त्याने फक्त 6 चेंडूंचा सामना केला आणि 5 धावा करून बाद झाला. अवघ्या 48 धावांवर 2 गडी तंबूत गेले होते. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 103 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली. पण कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला आणि डाव पुन्हा गडगडला. शुबमन गिल 75 चेंडूत 80 धावांवर असताना तंबूत गेला. त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला होता.
शुबमन गिलनंतर जबाबदारी श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदरवर आली. पण 35 धावांवर असताना श्रेयस धावचीत झाला आणि संघ अडचणीत आला. त्यानंतर आलेला केएल राहुल देखील फक्त 1 धाव करून तंबूत परतला. 160 धावांवर 4 गडी तंबूत होते. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतक ठोकलं. त्याच्या कामगिरीमुळे भारताचा विजय सोपा झाला. वॉशिंग्टन सुंदरला अर्धशतकासाठी चार धावांची गरज होती आणि विजयासाठी 3 धावा आवश्यक होत्या. वॉशिंग्टन सुंदरने षटकार मारला आणि विजयासह अर्धशतकही साजरं केलं.