Last Updated:
वारंवार पोट जड वाटणं, गॅस, बद्धकोष्ठता, निद्रानाश, विनाकारण चिडचिड होणं किंवा मन उदास वाटणं यांसारख्या समस्या जाणवत असतील, तर हे पचनाच्या समस्यांचे आणि त्याचा मनावर होणाऱ्या परिणामांचं लक्षण असू शकतं. अशा वेळी, आपल्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे वेळीच लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
मुंबई : पोट बिघडतं तेव्हा खाण्यात काय होतं याचा विचार साहजिकच केला जातो. अनेकदा यात उत्तर मिळतं पण काही वेळा उपचार, खाण्यात बदल करुनही पोटाची समस्या पूर्णपणे बरी होत नाही.
आहारपद्धतीतले बदल आणि तणावामुळे बहुतेकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. पण पचनसंस्थेचा आपल्या मेंदूवर आणि मनस्थितीवर थेट परिणाम होतो, याचा विचार कमी जण करतात. आपली पचनसंस्था आणि मेंदू यांच्यात अत्यंत जवळचा संबंध असल्याचं डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी म्हटलंय.
आतडी आणि मेंदू हे एका मज्जातंतूद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात आणि सतत एकमेकांना संकेत सिग्नल्स पाठवत असतात. आतड्यांच्या कार्यात काही बिघाड झाला, तर त्याचा थेट परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होतो; ज्यामुळे नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
आतड्यांमधील सूक्ष्मजीव म्हणजेच gut microbiota, सेरोटोनिन आणि मानसिक आरोग्य यांच्यात परस्पर संबंध असतात. आपल्या आतड्यांमधे ‘गट मायक्रोबायोटा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या संख्येनं उपयुक्त जीवाणूंचं वास्तव्य असतं.
हे जीवाणू शरीराला ‘सेरोटोनिन’ नावाचं संप्रेरक – हार्मोन तयार करण्यास मदत करतात; याला ‘आनंदाचे संप्रेरक’ तसंच हॅपिनेस हार्मोन असंही म्हटलं जातं. आतड्यांमधे टाकाऊ पदार्थ साचतात किंवा पचनक्रियेत बिघाड होतो, तेव्हा या उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी होऊ लागते. यामुळे शरीरात सूज वाढते आणि ती रक्तप्रवाहाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते.
याचा परिणाम मेंदूच्या कार्यपद्धतीवर होतो, ज्यामुळे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय व्यक्तीला नैराश्य, चिंता आणि अस्वस्थता जाणवू लागते. म्हणूनच, बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोट फुगणं यांसारख्या दीर्घकालीन समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमधे नैराश्य आणि चिंतेची लक्षणं दिसून येण्याची शक्यता अधिक असते.
Mumbai,Maharashtra
