मुंबईसह राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. अशा पावसाळी दिवसांत विकेंडला शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची इच्छा अनेकांची असते. धुक्याने वेढलेले डोंगर, कोसळणारे धबधबे, हिरव्यागार दऱ्या आणि थंडगार वारा अनुभवायचा असेल तर मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेली ही चार हिल स्टेशनं उत्तम पर्याय ठरू शकतात.
लोणावळा हे मुंबईपासून अवघ्या 90 किलोमीटरवर असलेले सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात येथील भुशी धरण, टायगर पॉईंट, राजमाची किल्ला आणि परिसरातील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. हिरवाईने नटलेला परिसर आणि थंडगार वातावरणामुळे विकेंड ट्रिपसाठी हे नेहमीच पसंतीचे ठिकाण ठरते.
खंडाळा हे लोणावळ्यालगतचे शांत आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. अमृतांजन पॉईंट आणि ड्यूक्स नोज येथून सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहता येते. पावसाळ्यात घाटरस्त्यांवर पसरलेले धुके आणि हिरवाई प्रवास अधिक संस्मरणीय बनवतात.
माथेरान हे आशियातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. वाहनांची वर्दळ नसल्यामुळे येथील वातावरण स्वच्छ आणि शांत असते. पॅनोरमा पॉईंट, लुईसा पॉईंट, घनदाट जंगल, लाल मातीचे रस्ते तसेच घोडेस्वारी आणि छोट्या ट्रेक्सचा अनुभव पर्यटकांना वेगळीच मजा देतो.
इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण पावसाळ्यात अधिक खुलून दिसते. भातसा धरण, डोंगररांगा, धबधबे आणि धुक्याने वेढलेले वातावरण ट्रेकिंग व निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते.




