धाराशिव : पंढरीच्या वारीला सुरुवात झाली असून याच महिन्यात 25 जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi) साजरी होत आहे. त्यासाठी, हजारो दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देखील मजल दरमजल करत वारीत सहभागी झाले आहेत. मानाच्या पालख्यांचे देखील पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले असून श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत मुक्ताई, श्री संत गजानन महाराजांच्या पालख्याही आता पंढरपूरजवळ (Pandhapur) पोहोचत आहेत. या वारीत, दिंडीत सर्वकाही विसरुन भाविक तल्लीन होऊन विठुनामाचा जप करत आहेत. विशेष म्हणजे दृष्टिहीनांची विठ्ठल भक्ती देखील याची देही याची डोळा पाहायला मिळत असून संत सूरदास महाराज दिव्यांग बांधवांचीही 450 किमीची पायी वारी सुरू आहे.
आषाढीसाठी विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनी घेऊन तब्बल 450 किलोमीटरचा पायी प्रवास करत दृष्टिहीन वारकरी पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. धाराशिव जिह्यातील कळंब शहरात दाखल होताच, स्थानिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. विठ्ठल भक्तीला डोळ्यांची नव्हे तर श्रद्धेची दृष्टी लागते, याचा प्रत्यय देणारी वाशिम येथील संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारी आज धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दाखल झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दिंडीत 15 दृष्टिहीन वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी 5 स्वयंसेवक सहभागी आहेत. तब्बल 450 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे वारकरी मजल-दरमजल पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
आपल्याला डोळ्यांनी विठ्ठल पाहता येत नसला तरी अंतःकरणातील अखंड श्रद्धा, नामस्मरण आणि भक्तीच्या बळावर हे वारकरी पंढरीची वाट चालत असून, त्यांच्या जिद्दीचा आणि भक्तीभावाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हेही वाचा
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया