रितेश देशमुख, विलासराव देशमुखImage Credit source: Instagram
अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कॉमेडी, अॅक्शन ते ऐतिहासिक अशा सर्व प्रकारच्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. सध्या तो ‘लॉक अप 2’ या शोचं सूत्रसंचालन करतोय. नुकत्याच एका एपिसोडमध्ये रितेश त्याच्या आयुष्यातील एक असा अनुभव सांगितला, जो ऐकून स्पर्धकही भावूक झाले होते. “इंडस्ट्रीत पदार्पण केल्यावर लोकांनी माझ्या मेहनतीकडे न पाहता माझ्या वडिलांच्या स्थानाकडे पाहिलं. मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे मला काम मिळतं, असा लोकांचा समज आहे. ही ओळख पुसून टाकण्यासाठी मला बराच वेळ लागला”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
‘लॉक अप 2’ या शोमध्ये एका टास्कपूर्वी स्पर्धक योगेश रावतला उत्तर देताना रितेश देशमुखने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. करिअरच्या सुरुवातीला रितेशवर ‘मुख्यमंत्र्यांचा मुलगा’ असा लेबल लावण्यात आला होता. याच अनुभवाविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला. शोमध्ये योगेश रावतला ‘चीटर’ (फसवणूक करणारा) असं लेबल लावण्यात आलं होतं. लोक संपूर्ण सत्य न जाणता मला फसवणूक करणारा म्हणत आहेत, यामुळे माज्या कुटुंबाला लाजिरवाणं वाटतंय, असं तो म्हणतो. त्याला समजावून सांगताना रितेश म्हणतो, “जेव्हा मी माझा पहिला चित्रपट केला, तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सगळे म्हणायचे, त्याचे वडील मुख्यमंत्री आहेत, म्हणूनच त्याला काम मिळतंय आणि म्हणूनच त्याचे चित्रपट यशस्वी होत आहेत. मीसुद्धा अशा टप्प्यातून गेलो आहे.”
योगेशचं बोलणं ऐकल्यानंतर रितेशने स्पष्ट केलं की, लोकांची मतं अनेकदा ते बाहेरून कसं दिसतात, यावर आधारित असतात. “तुम्ही बाहेरून कसं दिसता, यावर लोकं मतं बनवतात. आम्ही सर्वजण यातून गेलो आहोत. आज 23 वर्षांनंतर आणि 60 चित्रपटांनंतर मी तुमच्यासमोर उभा आहे. मी ते सर्व शिक्के मोडून काढले आहेत. काही शिक्के मोडायला वेळ आणि मेहनत लागते, पण जर तुम्ही दृढनिश्चयी असाल, तर ते मोडले जाऊ शकतात”, असं रितेश पुढे म्हणतो.
रितेशने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. त्याने 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘हे बेबी’, ‘मस्ती’, ‘लय भारी’, ‘वेड’, ‘राजा शिवाजी’ यांसारख्या हिंद आणि मराठी चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.