पहिल्या बॉलवर सिक्स मारतो, मग वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूपासून स्ट्राइकवर का येऊ दिलं नाही? – Marathi News | Why Team India A opener Vaibhav Sooryavanshi Not Taking Strike from first ball In Super Over vs Sri Lanka A


श्रीलंकेत सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत भारतीय अ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सामना टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर झाली. भारतीय अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 265 धावा केल्या होत्या. श्रीलंका अ संघाने सुद्धा 9 बाद 265 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 16 धावा केल्या. भारताला विजयासाठी 17 धावा करण्याची गरज होती. पण भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे या दोघांना फक्त 9 धावाच करता आल्या. 8 धावांनी भारतीय अ संघाचा पराभव झाला. या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग अजून किचकट बनला आहे. भारत अ विरुद्ध श्रीलंक अ सामना वादांमुळे गाजला. कमी सूर्यप्रकाश, वादग्रस्त अंपायरिंग आणि वैभव सूर्यवंशीची श्रीलंकन खेळाडूंसोबत झालेली बाचाबाची, धक्काबुक्की यामुळे हा सामना गाजला.

भारतीय टीमसाठी हा करो या मरो सारखाच सामना होता. जिंकणं आवश्यकच होतं. इतक्या महत्वाच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीने स्ट्राइक का घेतली नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. सुपर ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली, त्यावेळी वैभव सूर्यवंशी ऐवजी सातव्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या सूर्यांश शेडगेने स्ट्राइक घेतली. कुगाथस मथुलनच्या पहिल्या तीन चेंडूवर वैभवला स्ट्राइकच मिळाली नाहीच. पहिल्या तीन चेंडूंवर शेडगे फक्त तीनच धावा करु शकला.

दोन निर्णय टीम इंडियावर भारी पडले

वैभव चौथ्या चेंडूवर स्ट्राइकवर आला, त्यावेळी त्याने दोन धावा केल्या. पाचव्या चेंडूवर त्याने चौकार खेचला. शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी मथुलनने अचूक यॉर्करचा वापर केला. वैभवला धावा घेता आली नाही. त्यासोबतच भारतीय अ संघाने हा सामना गमावला. वैभव सूर्यवंशी पहिल्या चेंडूपासून स्ट्राइकवर असता तर कदाचित टीम इंडियाने हा सामना जिंकला असता. सुपर ओव्हरमध्ये वैभवला स्ट्राइक उशिराने मिळणं आणि अंपायरचे वादग्रस्त निर्णय टीम इंडियावर भारी पडले.

ते सहज सामना जिंकतील असं वाटत होतं

श्रीलंका अ ने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. भारतीय अ संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी 266 धावांचं टार्गेट सेट केलं. एकवेळ श्रीलंकेची स्थिती 6 बाद 229 होती. ते सहज सामना जिंकतील असं वाटत होतं. पण अखेरीस श्रीलंका ए संघाला 9 बाद 265 धावांच करता आल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *