आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील ‘त्या’ 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला ‘दे धक्का’


मुंबई : देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत (BMC) यंदा पहिल्यांदाच भाजपने बहुमत मिळवत आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेत सध्या भाजप महायुतीकडून देण्यात येणारे आदेश सर्वोतोपरी असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिकेच्या चार प्रस्ताव फेरविचारासाठी घेण्यात आले असून सुधार समितीत प्रशासनाने या प्रस्तावावर माघार घेतली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच यात लक्ष घातल्याचं भाजप आमदार मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्र्‍यांना फोनवरुन बोलणेही केल्याची माहिती मिलिंद नार्वेकर यांनी दिली. तर, हा मुंबईकरांचा विजय असल्याचे म्हणत आदित्य ठाकरेंनीही या स्थगिती निर्णयाचं स्वागत केलंय. 

मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत आज चार महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत आले. त्यामध्ये, सेव्हनहिल्स रुग्णालयाचे PPP मॉडेलद्वारे खासगीकरण, 5 उपनगरी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे PPP प्रस्ताव, वांद्रे रेक्लेमेशनमधील Exhibition Centre आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित करण्यात आले आहेत. या सर्व प्रस्तावांवर आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. काही प्रस्तावांवर चर्चेविनाच ब्रेक देण्यात आला असून अध्यक्षांकडून प्रस्ताव प्रशासनाकडे पुन्हा फेरविचारासाठी पाठवण्यात आले आहेत. रक्तपेढी प्रस्तावावर तर खुद्द शिंदे गटाच्या नगरसेवकाकडूनही फेरविचाराची सूचना करत आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला होता. 

मुंबई महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे, आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सुधार समितीतील चार महत्त्वाचे आणि वादग्रस्त प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत पाठवण्यात आले आहेत. यात सेव्हनहिल्स रुग्णालयाचे खाजगीकरण, 5 उपनगरीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचा PPP प्रस्ताव, वांद्रे रेक्लमेशन येथील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाच्या प्रस्तावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कालच आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन, ‘मुंबईच्या जमिनी लाटण्यासाठी शिंदे सेनेने हे प्रस्ताव आणले आहेत,’ असा थेट आणि गंभीर आरोप केला होता. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. सूत्रांनुसार, काल रात्री ‘मातोश्री’वरून थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन गेला. 

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्‍यांना फोन

आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन याविषयी बोलणं केल, आदित्य ठाकरेंच्या आक्षेपांनंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीसांना या प्रस्तावांमधील मध्यरात्री फोन करून त्रुटींची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर फडणवीसांनी मध्यरात्रीच भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला आणि प्रस्ताव मंजूर न करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे तूर्तास सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष टळला असला, तरी फडणवीस आणि मातोश्रीच्या वाढत्या समन्वयामुळे शिंदे गटाला मात्र मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *