Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दोषी! श्रीलंकेत नको नको ते कृत्य केलं, BCCIच्या टेबलावर पोहोचलं प्रकरण, तिलक वर्माही सुट्टी नाही


Vaibhav Sooryavanshi Fined India A vs Sri Lanka A : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा मालिकेदरम्यान भारत अ संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नाही, तर मैदानावरील वादामुळे. श्रीलंका अ विरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी सामना रेफरीनी वैभव सूर्यवंशीला दोषी ठरवत त्याच्या सामन्याच्या मानधनातील 50 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त वैभव सूर्यवंशीच नाही, तर श्रीलंका अ संघाचा खेळाडू विशेन हलाम्बेज यालाही या प्रकरणात दोषी मानण्यात आले असून त्याच्यावरही 50 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामना संपल्यानंतर हा वाद झाला. श्रीलंका अ संघाने विजय मिळवल्यानंतर आक्रमक पद्धतीने जल्लोष केला. त्यावेळी विशेन हलाम्बेज याने वैभव सूर्यवंशीवर वैयक्तिक टिप्पणी केल्याचे सांगितले जाते. या वक्तव्यामुळे संतापलेल्या सूर्यवंशीने श्रीलंकेच्या खेळाडूंकडे जाऊन जाब विचारला. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि परिस्थिती धक्काबुक्कीपर्यंत पोहोचली. मैदानावरील इतर खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हा वाद शांत केला. मात्र या घटनेची दखल घेत सामना रेफरींनी चौकशी केली आणि दोन्ही खेळाडूंना शिक्षा सुनावली.

मालिकेत वैभवची कामगिरी निराशाजनक

वादामुळे चर्चेत आलेल्या वैभव सूर्यवंशीची या स्पर्धेतील कामगिरीही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. 15 वर्षीय या डावखुऱ्या फलंदाजाला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याने आतापर्यंत चार सामने खेळले असून मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आहे. अफगाणिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात त्याने 28 चेंडूत 38 धावांची खेळी केली होती. त्या डावात त्याला दोन जीवदानही मिळाले होते, मात्र त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला.

कर्णधार तिलक वर्मावरही कारवाई

फक्त वैभवच नाही, तर भारताचा कर्णधार तिलक वर्मा याच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तिलक सामन्यादरम्यान मैदानी पंचांशी दोन वेळा वाद घालताना दिसला. पहिल्यांदा अपुऱ्या प्रकाशामुळे सुपर ओव्हर होणार नाही, असे पंचांनी सांगितल्यावर तिलकाने आक्षेप घेतला. त्यानंतर दुसऱ्यांदा सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पंचांनी ‘नो-बॉल’ दिल्यानंतर तिलकने पंचांशी जोरदार हुज्जत घातली. तिलक वर्माला 30 टक्के मॅच फी दंड ठोकला आहे.

अंतिम निर्णय BCCI च्या हातात

आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणे अ संघांच्या सामन्यांमध्ये आयसीसी (ICC) थेट कारवाई करत नाही. नियमांनुसार, मॅच रेफरी केवळ आपल्या शिफारसी संबंधित क्रिकेट बोर्डाकडे पाठवतात. त्यामुळे वैभव सूर्यवंशी आणि तिलक वर्मा यांच्यावर हा दंड लागू करायचा की नाही, याचा अंतिम निर्णय आता बीसीसीआय घेणार आहे.

भारत अ संघ फायनलमध्ये! 

दरम्यान, भारत अ संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे अफगाणिस्तान अ संघाविरुद्धचा 101 धावांचा दणदणीत विजय. या विजयामुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला असून अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने 50 षटकांत 319 धावांचा डोंगर उभारला. प्रियांश आर्याने 58, तिलक वर्माने 59 आणि कुमार कुशाग्रने 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विपराज निगम आणि ऋतुराज गायकवाड यांनी प्रत्येकी 30 धावांचे योगदान दिले. 320 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान अ चा संघ 218 धावांत गारद झाला.

हे ही वाचा –

Ind vs Afg Tri-Nation A Series : बदला पुरा झाला..! अफगाणिस्तानला 101 धावांनी लोळवून टीम इंडियाची फायनलमध्ये; आता ट्रॉफीसाठी कोणाशी भिडणार?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *