बुलढाणा : राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग (FDI) अचानक अॅक्शन मोडवर आला असून गेल्या महिनाभरात कारवाईचा धडाकाच लागला आहे. त्यामुळे, अवैध गुटखा विक्रेते, अन्न पदार्थांत भेसळ करणारे, हॉटेलवाले आणि मेडिकवाल्यांचेही धाबे दणाणले आहेत. कारण, तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून जोरदार कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मुंढेंच्या या कारवाईचं राज्यभरातून स्वागत होत असून शेतकऱ्यांकडूनही त्यांच्या कामाला कौतुक करत चक्क त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता राज्याच्या माजी मंत्र्यांनी तुकाराम मुंढेंच्या कामाचं हटकेस्टाईलने कौतुक करत वेगळीच मागणी केलीय.
बुलढाणा जिल्ह्यातील नेते आणि माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून वेगळीच मागणी केलीय. “महाराष्ट्रात कायदेशीर आदेशाची अंमलबजावणी तुकाराम मुंढे करत आहेत आणि त्यांच्या कारवाईमुळेच भ्रष्टाचार व भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. राज्यात सध्या भेसळखोर आणि भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. तुकाराम मुंढे ज्याप्रमाणे काम करत आहेत तसंच काम आपणांसह सर्व खातेप्रमुखांनी करावं अशी जनतेची भावना आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही. त्यामुळे, तुकाराम मुंढे यांचं एक बाटली रक्त काढून ते थोडं थोडं आपणांसह राज्यातील सर्व खाते प्रमुखांना द्यावं, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे केली आहे
तुकाराम मुंढे यांचं एक बाटली रक्त काढून ते थोडं थोडं आपणांसह राज्यातील सर्व खाते प्रमुखांना द्यावं, जेणेकरून त्यांच्यासारखी काम करण्याची प्रेरणा व कार्यक्षमता निर्माण होऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. ज्याप्रमाणे अशक्त रुग्णाला रक्ताची बॉटल देऊन बरं करण्यात येत त्याचप्रमाणे तुकाराम मुंडे यांचं रक्त देऊन आपणासह सर्व राज्यातील खातेप्रमुखांना काम करण्याची शक्ती मिळेल, अशा शब्दात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र लिहून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी खोचक टोला लगावला आहे.
शासकीय विभाग प्रमुखांना रक्त द्यावं – सावजी
अशक्त रुग्णाला सशक्त रुग्णाचे रक्त देऊन बरे करण्यात येते. त्यामुळे, तुकाराम मुंढेंचं रक्त राज्यातील सर्वच शासकीय प्रमुखांना द्यावं, म्हणजे तुकाराम मुंढेंसारखं काम करण्याची प्रेरणा आणि शक्ती राज्यातील सर्वच विभागाच्या खातेप्रमुखांना मिळेल, असेही सावजी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे, सध्या त्यांचं हे पत्र सोशल मीडियातूनही व्हायरल होत आहे.
हेही वाचा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न