The Pyramid Scheme Review | TVFची भन्नाट सिरीज; झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात अडकलेल्या लोकांची वास्तववादी गोष्ट



The Pyramid Scheme Review: सोशल मीडियावर तुम्ही बल्लभगडच्या ज्योतीसारख्या रील्स नक्कीच पाहिल्या असतील. सूट-बूट घातलेले लोक मोठमोठ्याने ओरडत असतात, “मी डायमंड बनेन”, “मी करोडपती होणार!” अशा गोडगोड स्वप्नांच्या आड लपलेला असतो एक मोठा फसवणुकीचा खेळ. यालाच MLM म्हणजेच मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणतात. काही लोकांना आपल्या नेटवर्कमध्ये जोडा, ते पुढे आणखी लोक जोडतील आणि शेवटी हजारो लोकांचे पैसे घेऊन कंपनी गायब होईल. अशा प्रकारच्या फसवणुकीला अनेकजण बळी पडले आहेत. याच विषयावर आता पहिल्यांदाच एक सिरीज आली आहे आणि TVF ने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अतिशय रिलेटेबल विषय पडद्यावर आणला आहे.

कथानक काय?

ही कथा आहे गोल्डी चौहाण (परमवीर सिंह चीमा), मनोज श्रीवास्तव (रणवीर शौरी) आणि अशाच अनेक लोकांची. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काहीतरी मोठं करण्याची स्वप्नं त्यांच्याकडे आहेत, पण पैशांची कमतरता आहे. अशावेळी त्यांना दाखवली जातात झटपट श्रीमंत होण्याची स्वप्नं. “फक्त थोडी गुंतवणूक करा, कंपनी जॉइन करा, काही लोकांना जोडा आणि सहा महिन्यांत बाईकवरून थेट प्रायव्हेट जेटपर्यंत पोहोचा!” अशा आमिषांनी त्यांना जाळ्यात ओढलं जातं.

यानंतर सामान्य लोकांची फसवणूक कशी केली जाते, त्यांच्या पैशांचा गैरवापर कसा होतो आणि या संपूर्ण साखळीमागचं वास्तव काय आहे, हे सिरीज अत्यंत प्रभावीपणे दाखवते.

सिरीज कशी आहे?

ही एक दमदार सिरीज आहे. तिचा विषयच इतका रिलेटेबल आहे की अनेकांना ती स्वतःच्या आसपास घडलेली गोष्ट वाटेल. TVFची खासियत म्हणजे ते आपल्या दैनंदिन आयुष्यातील कथा घेऊन येतात. आज जिथे बहुतेक निर्माते एकाच प्रकारचं कंटेंट बनवत आहेत, तिथे TVF वेगळे प्रयोग करताना दिसतो आणि हीच या सिरीजची मोठी जमेची बाजू आहे.

सिरीजची सुरुवात खूपच प्रभावी आहे. नवीन सदस्य जोडण्याचे प्रसंग मजेशीर आणि वास्तववादी वाटतात. जर तुमच्या ओळखीतील कोणी MLMच्या जाळ्यात अडकला असेल, तर हे प्रसंग तुम्हाला लगेच रिलेट होतील. वरच्या स्तरावरील लोक खालच्या स्तरावरील लोकांचा कसा वापर करतात आणि त्यांच्या पैशांचं पुढे काय होतं, हेही सिरीज उत्तमपणे उलगडते.

मध्यंतरात सिरीज थोडी भरकटल्यासारखी वाटते आणि काही भाग अनावश्यकपणे लांबलेले वाटतात. मात्र, नंतर ती पुन्हा मुख्य कथेकडे परतते. सर्वसामान्यांच्या पैशांशी आणि त्यांच्या स्वप्नांशी जोडलेला भावनिक पैलू सिरीजची खरी ताकद आहे. सुमारे 40 मिनिटांचे 7 भाग काहीसे लांब वाटू शकतात, पण झटपट पैसा कमावण्याच्या मोहामागचं वास्तव ते प्रभावीपणे समोर आणतात. मेहनतीशिवाय यश मिळत नाही, हा महत्त्वाचा संदेशही सिरीज देते.

अभिनय कसा ?

परमवीर सिंह चीमा यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट अभिनय केला आहे. काहीतरी मोठं करण्याची इच्छा असलेला, पण योग्य मार्ग शोधत असलेला तरुण त्यांनी अतिशय नैसर्गिकपणे साकारला आहे. आजच्या लाखो तरुणांचं प्रतिनिधित्व करणारी ही भूमिका त्यांनी अक्षरशः जगली आहे. रणवीर शौरी यांनी मनोज श्रीवास्तवच्या भूमिकेत कमाल केली आहे. त्यांच्या कारकिर्दीतील अलीकडच्या काळातील हा सर्वोत्तम अभिनय म्हणता येईल. अल्फिया जाफरी यांनाही चांगली संधी मिळाली असून त्यांनी आपली अभिनयक्षमता प्रभावीपणे दाखवून दिली आहे. अंजन श्रीवास्तव यांना बाबू अर्थात आजोबांच्या भूमिकेत पाहणं आनंददायी ठरतं. शेखर सुमन, स्मिता बन्सल आणि रवि बहल यांनीही आपल्या भूमिका उत्तम प्रकारे निभावल्या आहेत. एकूणच सर्व कलाकार आपल्या भूमिकांमध्ये फिट बसतात.

लेखन आणि दिग्दर्शन

या सिरीजचे निर्माते श्रेयांश पांडे आहेत. त्यांची ‘गुल्लक 5’ देखील याच आठवड्यात प्रदर्शित झाली असून ते सातत्याने दर्जेदार काम करताना दिसतात. सिरीजचं लेखन अक्षेंद्र मिश्रा यांनी केलं आहे, तर दिग्दर्शनाची धुरा आशीष आर. शुक्ला यांनी सांभाळली आहे. लेखन चांगलं असलं तरी ते आणखी धारदार होऊ शकलं असतं. 7 भागांऐवजी 5 भागांमध्ये कथा संपवली असती, तर परिणाम अधिक प्रभावी झाला असता. मात्र दिग्दर्शनाच्या बाबतीत सिरीज उत्तम ठरते. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी आणि संघर्ष वास्तववादी पद्धतीने मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. एकूणच, TVFची ही आणखी एक दर्जेदार आणि पाहण्यासारखी सिरीज आहे. MLMसारख्या विषयावर वास्तववादी आणि मनोरंजक पद्धतीने भाष्य करणारी ही सिरीज नक्की पाहण्यासारखी आहे.

रेटिंग : 3.5/5 स्टार्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *