Last Updated:
राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांना वेटिंगवरच ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला.
मुंबई : महायुती सरकारमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार खासदार फोडण्याचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत एक वेगळाच प्रकार घडला. भर व्यासपीठावर सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील जीएसटी दिनाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी जाण्याचं टाळ्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची सूत्र आपल्या हातात घेतली. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी राज्यभरात कामाचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून होत असलेल्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहत आले. पण, आज मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित कृषी पुरस्कार वितरण समारंभामध्ये भलताच प्रकार घडला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांना वेटिंगवरच ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला. सूत्रसंचालकाने सुनेत्रा पवार यांचं नाव भाषणासाठी दोन वेळा पुकारले त्यानुसार त्या आल्याही पण भाषणच झाले नाही. आधी सुनेत्रा पवार यांना सत्कार न करताच भाषणासाठी बोलवण्यात आलं मग चूक लक्षात येताच पुन्हा सत्कार करण्यात आला.
सत्कारानंतर सुनेत्रा पवार यांना पुन्हा भाषण करण्यासाठी बोलवण्यात आलं, त्या पोडियमजवळ येऊन थांबल्या, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याने पुन्हा त्यांना पोडियम जवळ थांबावं लागलं, सूत्रसंचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराबाबत संचालन आटोपताच राज्यपालांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचून दाखविला. राज्यपालांची ओळख करून देऊन थेट राज्यपालांचे भाषणाला सुरुवात झाली. तर सुनेत्रा पवार भाषणाला मात्र संचालकांच्या मागेच उभ्या होत्या. शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वत: च्या जागेवर जाऊन बसल्या आणि राज्यपालांचे भाषण झाल्यावर त्यांना भाषणासाठी पुन्हा बोलविण्यात आलं.
त्यानंतर प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर इथं सीजीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई विभागातर्फे जीएसटी दिनाचा कार्यक्रम पार पडला. पण, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोहोचल्या नाही. निमंत्रितांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव असतानाही त्यांनी येणं टाळल्यानं चर्चांना उधाण आलं. कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रम सोहळ्यात झालेल्या गोंधळामुळे सुनेत्रा पवार यांनी येणं टाळलं, असल्याचं सांगितलं जात आहे.
Mumbai,Maharashtra
Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी GST विभागाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं? आधी कृषी पुरस्काराच्या कार्यक्रमात घडला भलताच प्रकार
