आज सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशामुळे वरळीमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडेल, 2029 विधानसभेची निवडणूक आदित्य ठाकरेंना जड जाईल असं चित्र रंगवलं जातय. 2029 विधानसभेला वरळीमध्ये काय चित्र असेल हे आत्ता सांगता येणार नाही. सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे काही प्रमाणात फरक पडेल हे खरं आहे. पण वरळीचा खरा किंग मेकर सचिन अहिर नसून सुनील शिंदे आहेत. आदित्य ठाकरे दोनवेळा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले, ते सुनील शिंदे यांच्यामुळेच. तळागाळात दांडगा जनसंर्पक असलेला हा नेता आहे. सुनील शिंदे यांची मतदारसंघातील ताकद यामुळेच अजून ठाकरे गट वरळी विधानसभा क्षेत्रात मजबूत आहे. सुनील शिंदे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत.
सुनील शिंदे जास्त चर्चेत,प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत. पडद्यामागे राहून काम करतात आणि गेम फिरवतात. त्यामुळे सुनील शिंदे बाहेर पडले तर तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरेल. सुनील शिंदे हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेला शिवसैनिक आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कामगार भागातून येणाऱ्या सुनील शिंदे यांनी स्वकर्तुत्वाने मतदारसंघावर ठसा उमटवला आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहेत. बीडीडी चाळीपासून ते वरळी कोळीवाड्यापर्यंत आजही उद्धव ठाकरे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी भक्कम आहे, ते सुनील शिंदे यांच्याासारख्या शिवसैनिकामुळे.
विविध समित्यांची पदं संभाळली
सुनील शिंदे आमदार असले तरी त्यांचा प्रवास हा महापालिकेपासून सुरु आहे. महापालिकेत त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून बरीच वर्ष काम केलय. बेस्ट समितीपासून विविध समित्यांची पदं संभाळली आहेत. त्या माध्यमातून जनसंर्पक बनवला. घराघरात पोहोचले. 2014 साली त्यांना पहिल्यांदा तिकिट मिळालं, त्यावेळी त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. सचिन अहिर यांचा पराभव केला होता. पुढे 2019 मध्ये आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहिले.
ते बाहेर पडले तर ठाकरे गटाला भविष्याच्या राजकारणात नक्कीच फटके बसतील
त्यावेळी त्यांची जागा सुरक्षित करण्यासाठी सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश दिला. आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर शिवसेनेने सुनील शिंदे आणि सचिन अहिर या दोघांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. आज उद्धव ठाकरे यांना इतके धक्के बसल्यानंतर सुनील शिंदे अजूनही ठाकरे गटातच आहे. ते बाहेर पडले तर ठाकरे गटाला भविष्याच्या राजकारणात नक्कीच फटके बसतील. म्हणूनच नितेश राणे सुनील शिंदेंना म्हणाले की, ‘नका राहू तिथे, या इकडे’