नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो अशा चर्चा रंगल्या आहेत. रोहित शर्मानं यापूर्वीच टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतेली आहे. त्यामुळं आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 पर्यंत रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग असेल, अशी आशा होती. मात्र, टीम मॅनेजमेंट आणि निवड समिती रोहित शर्माला टीममधून बाहेर काढण्यास सहमत झाले आहेत. लॉर्डस मध्ये होणारा एकदिवसीय सामना रोहितच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील शेवटचा सामना असू शकतो.
टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि विकेटकीपर पार्थिव पटेलनं रोहित शर्माचं समर्थन केलं आहे. रोहित शर्मा टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देईल. पुढील सामन्यात रोहित चांगली फलंदाजी करेल, अशी आशा पार्थिव पटेलनं केली आहे.
रोहित शर्मानं शतक करावं : पार्थिव पटेल
रोहित शर्मानं इंग्लंड दौऱ्यात दोन्ही सामन्यात मिळून 37 धावा केल्या आहेत. पहिल्या वनडेत रोहित शर्मा 11 आणि दुसऱ्या वनडेत 26 धावा करु शकला. गेल्या 8 वनडेत रोहित शर्मानं 241 धावा केल्या आहेत. पार्थिव पटेल यानं जिओ हॉटस्टारच्या शोमध्ये म्हटलं की जर खरंच रोहित शर्माच्या करिअरमधील लॉर्डस वनडे शेवटची मॅच असेल तर त्यानं शतकानं शेवट केला पाहिजे. रोहित तसं करण्यामध्ये सक्षम आहे. रोहितनं त्याच्या करिअरमध्ये दोन तीन वेळा अपयशी ठरल्यानंतर पुढील डावात मॅच विनिंग फलंदाजी केली आहे.
रोहित शर्मानं वनडे करिअरमध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या असून त्याच्या नावावर 33 शतकांची नोंद आहे. रोहित शर्मानं तीन द्विशतकं केली आहेत. विराट कोहली आणि रोहितशर्मा यांच्यामध्ये सातत्याबाबत फरक राहिलेला आहे. रोहित शर्मा प्रत्येक मॅचमध्ये मोठी खेळी करत नाही, मात्र जेव्हा करतो तेव्हा मोठी आणि प्रभावी फलंदाजी करतो तो प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकतो, असं पार्थिव पटेल म्हणाला.
पार्थिव पटेल म्हणाला की, रोहित शर्माला बॉऊन्समोर संघर्ष करावा लागत होता, त्याला लय प्राप्त करता आली नाही. मात्र रोहित शर्माकडे टीकाकारांना उत्तर देण्यासाठी एक संधी आहे, त्यानं नेहमीच फलंदाजीनं उत्तर दिलं आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात स्थान मिळणार नाही हे रोहित शर्माला निवड समितीनं कळवलं असल्याचं सांगितलं जातंय, त्यामुळं रविवारी होणाऱ्या वनडे मॅचनंतर रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करु शकतो, किंवा त्याला पुढील काळात संघातून वगळलं देखील जाऊ शकतं.