Last Updated:
Mumbai Rain: एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावली असून अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयांतील साठा झपाट्याने घटत आहे.
मुंबई: मान्सूनने ओढ दिली असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या धरणांमध्ये केवळ 9.67 टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून पुढील दहा दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास 20 ते 25 टक्के पाणीकपात लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
महापालिकेकडून 15 जूनपासून शहरात 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर वापरांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. 17 जूनपासून बांधकाम प्रकल्प आणि जलतरण तलावांना दिल्या जाणाऱ्या पाणीजोडण्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच औद्योगिक, व्यापारी आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लब यांच्यासाठी 20 टक्के कपात लागू करण्यात आली आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावल्याने अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयांतील साठा झपाट्याने घटत आहे. या पार्श्वभूमीवर 29 जूननंतर परिस्थितीचा नव्याने आढावा घेण्यात येणार आहे. 2009 मधील तीव्र पाणीटंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन अतिरिक्त कपातीचाही विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः उंच भाग, टेकड्यांवरील वस्त्या आणि जलवाहिन्यांच्या शेवटच्या टोकावरील भागांमध्ये पाणीदाब कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांमधील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असली तरी अद्याप महापालिकेने त्या साठ्याला हात लावलेला नाही. पाणीसाठा सात टक्क्यांपर्यंत खाली आल्यास राखीव साठा वापरण्याची वेळ येऊ शकते.
Mumbai,Maharashtra
Mumbai Water Supply: मुंबईकर पाणी जपूनच वापरा! आता धरणांनीच दिला धोक्याचा अलर्ट, 10 दिवस महत्त्वाचे!
