Mohan Joshi Interview: ‘क्लायमॅक्स काय, पुढे काय घडणार आहे?’ तो काहीच सांगायला तयार नव्हता’, मोहन जोशींनी सांगितला देऊळ बंद २चा किस्सा


‘ देऊळ बंद २ ‘साठी दहा वर्षांनंतर पुन्हा स्वामींच्या भूमिकेत परतताना मनात काय भावना होत्या ?
साहजिकच खूप आनंद झाला. कारण एखादा सिनेमा खास तुमच्यासाठी लिहिला जातो, ही कलाकारासाठी मोठी गोष्ट असते. ‘देऊळ बंद’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. मी प्रामुख्यानं खलनायकाच्या भूमिका केल्या होत्या. त्यामुळे लोक मला स्वामींच्या शांत, अध्यात्मिक रूपात स्वीकारतील का, हा प्रश्न मनात होता. त्याचबरोबर स्वामींची भाषा, त्यांची बोलण्याची पद्धत, इंग्लिश टोन हे सगळं लोकांना पटेल का, अशीही शंका होती. पण प्रेक्षकांनी ते इतक्या सहजपणे स्वीकारलं, की मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. आता असं वाटतं, की दिग्दर्शक प्रवीण तरडेचा अंदाज अगदी बरोबर होता. त्यानं माझ्यावर दाखवलेला विश्वास मला महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच मी ठरवलं होतं की, प्रवीण माझ्याकडे जे काम घेऊन येईल, ते मी मनापासून करणार. त्यातही पुन्हा स्वामींची भूमिका साकारायची संधी मिळणं, ही तर माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.

सर्वात भावनिक गोष्ट कोणती ठरली ?
मधल्या काळात मी सतत काम करतच होतो. पण एक काळ असा आला, की प्रकृतीच्या कारणामुळे मला दीड वर्ष थांबावं लागलं. कलाकारासाठी हा काळ कठीण असतो. कारण तुम्ही थांबता, पण इंडस्ट्री थांबत नाही. परंतु, प्रवीण तरडे माइयासाठी थांबला. या सिनेमात काम करण्यासाठीच मी पुन्हा आजारातून उभा राहिलो. अर्धांगवायू झालेलं माझं शरीर पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहिलं ते. या सिनेमामुळेच. स्वामींची भूमिका ही केवळ एक भूमिका नव्हती, तर ती माझ्याशी भावनिकरीत्या जोडलेली होती. प्रवीण आणि संपूर्ण टीमनं माझ्यावर ठेवलेला विश्वास जपला. त्या विश्वासासाठीच मी पुन्हा उभा राहिलो आणि काम करण्याची ऊर्जा मिळाली. ‘देऊळ बंद २’ माझ्यासाठी फक्त सिनेमा नाही, तर भावनिक पुनरागमन आहे.

Maharashtra Times‘वरुण धवन कधीच सलमान खान बनू शकत नाही’ Chunnari Chunnari च्या रिमेकवर अभिजीत भट्टाचार्यंचा संताप
सिनेमाची संहिता वाचताना तुम्हाला सर्वात जास्त काय भावलं ?
आम्हाला पूर्ण संहिता वाचायला मिळाली नाही. मी सतत प्रवीणला विचारायचो, ‘क्लायमॅक्स काय आहे? पुढे काय घडणार आहे?’ पण तो काहीच सांगायला तयार नव्हता. पण त्याची पद्धत योग्य असल्याचं आज मला जाणवतं. कारण अनेकदा असं होतं की, एखाद्या कलाकाराला कथा सांगितली, को ती नकळतपणे इतरांपर्यंत पोहोचते. चर्चा, गप्पांमधून सिनेमाती गुपितं समजतात. हे सगळं टाळण्यासाठी प्रवीणनं संहितेचा बराचसा भाग स्वतःकडेच ठेवला होता. संपूर्ण कथा हातात असलीच पाहिजे असं नाही. प्रत्येक प्रसंग करताना पुढे काय होणार आहे, याची उत्सुकता कलाकारांमध्येही कायम राहते. ‘देऊळ बंद २’च्या बाबतीत हीच गोष्ट मला खूप वेगळी आणि खास वाटली.

देऊळ बंद २ वेळी पायात बाभळीचा काटा रुतला, पाय बधिर झाला; मोहन जोशींनी किस्सा सांगितला

‘देऊळ बंद २’च्या लिखाणाबद्दल तुमचं मत काय होतं?

सिनेमा पूर्ण झाल्यानंतर प्रवीणच्या लिखाणातली ताकद प्रकषांनं जाणवली. अनेक प्रसंग इतके सुंदर लिहिलेले आहेत, की कलाकार म्हणून काम करताना आपणही त्या दृश्यात हरवून जातो. मला त्याच्यात दिग्दर्शक प्रकाश झा यांची झलक दिसते. जसं प्रकाश झा समाज, भावना आणि नात्यांचं वास्तव पडद्यावर प्रभावीपणे उभं करतात, तसंच काहीसं प्रवीणच्या कामातही जाणवतं. फरक एवढाच, की प्रकाश स्वतः कॅमेराही हाताळतात; प्रवीण अजून त्या टप्प्यावर गेलेला नाही. पण त्याच्यात ती क्षमता नक्कीच आहे. अजून पाच-सहा सिनेमे त्यानं अशाच ताकदीनं केले, तर तो मोठा दिग्दर्शक म्हणून समोर येईल, याची खात्री आहे. ‘देऊळ बंद २’मध्येही त्यानं प्रत्येक व्यक्तिरेखेला एक वेगळी खोली दिली आहे.

चित्रीकरणादरम्यान ३३ तास सलग काम केलं. एवढी ऊर्जा आणि जिद्द नेमकी कुठून येते?
ही जिद्द, ऊर्जा प्रवीणमुळेच आली. आपण एखाद्या माणसाला जीव तोडून काम करताना पाहतो, तेव्हा वाटतं, की आपणही तितक्याच ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. प्रवीण हा अक्षरशः कामाच्या नशेत असलेला माणूस आहे. त्याच्यासाठी वेळ, थकवा किंवा मर्यादा या गोष्टी दुय्यम असतात. त्याच्या डोक्यात फक्त सिनेमा आणि काम असतं. गेल्या पाच-सहा चित्रपटांपासून आम्ही एकत्र काम करत आहोत, त्यामुळे त्याच्या काम करण्याच्या पद्धतीची आम्हाला सवय झाली होती. ‘देऊळ बंद २‘च्या चित्रीकरणावेळीही तसंच झालं. चित्रीकरण सुरू झालं, की वेळेचं भान राहत नव्हतं. पण त्यामागे एक वेगळीच ऊर्जा होती. कारण सेटवर प्रत्येक जण स्वतःला झोकून देऊन काम करत होता.
Maharashtra TimesSanjay Jadhav : ‘दुनियादारी 2’ येणार नाही, संजय जाधव यांचं वक्तव्य; म्हणाले, ‘सोशल मीडियावर बोलणं खूप सोपं, मेहनत दिसत नाही’

कधीकधी सिनेमाची संपूर्ण कथा वाचायला मिळत नाही. त्यावेळी प्रत्येक प्रसंग करताना पुढे काय होणार आहे, याची उत्सुकता कलाकारांमध्येही कायम राहते. ‘देऊळ बंद २’च्या बाबतीत हीच गोष्ट मला खूप वेगळी आणि खास वाटली.

कल्पेशराज कुबल

लेखकाबद्दलकल्पेशराज कुबलकल्पेशराज कुबल हे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये सिनिअर डिजिटल कंटेंन्ट क्रिएटर (सिनिअर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट) म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ११ वर्षांपासून ते पत्रकारिता, कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या आजअखेरच्या प्रवासात सांस्कृतिक सण-उत्सव, शिक्षण, फॅशन आदी विविध क्षेत्रे, विषयांची हाताळणी त्यांनी केली. विशेषत: गेल्या सहा वर्षांपासून मनोरंजन क्षेत्राचे वृत्तांकन (मराठी सिनेसृष्टी, बॉलिवूड आणि नाट्यसृष्टी विषयी लिखाण.) ते करत आहेत. दैनिकाच्या ‘थ्रीडी’ या चित्रपट समिक्षणाच्या सदरासाठी ते गेल्या पाच वर्षांपासून लिखाण करत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘माझी पहिली भूमिका’ हे त्यांचे सदर विशेष गाजले. कलाकारांच्या व्यावसायिक प्रवासाविषयी, विविधांगी भूमिकांविषयी या सदरात लिखाण त्यांनी केले आहे. ‘सिनेमा’ या विषयावर नियतकालिके, डिजिटल माध्यमात त्यांनी लिखाण केले आहे. कल्पेशराज हे तरुण पत्रकार असण्यासोबत ते ‘फोटोग्राफर’ आणि ‘आर्टिस्ट’ देखील आहे. तसेच त्याच्या नावावर भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे ‘लार्जेस्ट पेपर पोर्ट्रेट’ बनवण्याचा ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ आहे.आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *