Lord Kal Bhairav: भगवान कालभैरव….धार्मिक मान्यतेनुसार, कालभैरवनाथ हे भगवान शिवांचे रौद्र आणि रक्षक स्वरूप मानले जाते. पुराणांनुसार, ब्रह्मदेवाचा अहंकार दूर करण्यासाठी भगवान शिवांनी कालभैरवाची निर्मिती केली. त्यांना काळाचे अधिपती, न्यायाचे देव आणि नगररक्षक असेही संबोधले जाते. देशात अनेक देवांची विविध प्राचीन आणि रहस्यमय मंदिरे आहेत, जिथे पूजा-अर्चना आणि नैवेद्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. देशातील बहुतेक मंदिरांमध्ये देवाला फळे, लाडू, पेढे, बर्फी, नारळ इत्यादी अर्पण केले जातात, पण तुम्हाला माहित आहे का की देशात एक असे मंदिर आहे जिथे देवाला या गोष्टींऐवजी मद्य अर्पण करण्याची परंपरा प्रचलित आहे. जाणून घ्या नेमकी काय आहे ही परंपरा?
भगवान काळभैरवाला मद्याचा नैवेद्य अर्पण केला जातो…
आपण ज्या मंदिराबाबत बोलत आहोत, ते म्हणजे भगवान महाकाल यांचे शहर असलेल्या उज्जैनमधील काळभैरव मंदिर… येथे भगवान काळभैरवाला मिठाई किंवा फळे नव्हे, तर मद्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. भक्त देवाच्या चरणी दारूच्या बाटल्याही अर्पण करतात. हे दृश्य पहिल्यांदा भेट देणाऱ्यांना आश्चर्यचकित करते. उज्जैनमधील लोकांच्या मनात या काळभैरव मंदिराविषयी अत्यंत आदर आहे.
मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते?
उज्जैनच्या प्रसिद्ध काळभैरव मंदिरात, देवाला मिठाई नव्हे, तर मद्य अर्पण केले जाते. ही एक अनोखी परंपरा आहे, जिथे भक्त देवाला मद्य अर्पण करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ताटातील सर्व मद्य मूर्तीच्या तोंडाला लावताच नाहीसे होते. हे मंदिर उज्जैनचे कोतवाल असलेल्या भगवान काळभैरवावरील गाढ श्रद्धेचे प्रतीक आहे.
काळभैरवाला तामसिक पदार्थांचा नैवेद्य…
हिंदू सनातन धर्मात मद्यपान करणे पाप मानले जाते. धार्मिक स्थळांवर मद्यपानास मनाई आहे, परंतु भगवान काळभैरवाचे हे मंदिर याला अपवाद ठरते. तंत्रशास्त्र आणि तांत्रिक परंपरेनुसार, भगवान काळभैरव हे महादेवाचे एक उग्र रूप आहे. देवाच्या या रूपाची पूजा करताना मद्य सारख्या तामसिक पदार्थांचा नैवेद्य देणे आवश्यक आहे. या मंदिरातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कालभैरवांना मद्याचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा. भक्त पुजाऱ्यांकडे मद्याची बाटली देतात. पुजारी ते एका पात्रात घेऊन मूर्तीच्या मुखाजवळ धरतात आणि आश्चर्यकारकपणे ते मद्य मूर्ती “पिते”, अशी भक्तांची श्रद्धा आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून देश-विदेशातील भाविकांना आकर्षित करतो.
पौराणिक महत्त्व
हे मंदिर प्राचीन काळापासून तांत्रिक साधना आणि भैरव उपासनेचे प्रमुख केंद्र मानले जाते.
अशी मान्यता आहे की कालभैरवाची उपासना केल्याने भय, नकारात्मक शक्ती आणि अडथळ्यांपासून संरक्षण मिळते.
काळ, न्याय आणि संरक्षण यांचे अधिपती म्हणून त्यांची पूजा केली जाते.
रविवार, मंगळवार आणि कालाष्टमी या दिवशी येथे विशेष गर्दी असते.
कालाष्टमी आणि महाशिवरात्री या दिवशी मोठ्या प्रमाणावर उत्सव आणि विशेष पूजा आयोजित केल्या जातात.
मंदिराचे एक मोठे रहस्य… संपूर्ण मद्य नाहीसे कसे होते?
भगवान काळभैरवाला उज्जैन शहराचा सेनापती किंवा पोलीस प्रमुख मानले जाते. स्थानिक मान्यतेनुसार, महाकाल शहरात राहण्यासाठी भगवान काळभैरवाची परवानगी घेणे आवश्यक आहे. काळभैरवाच्या दरबारात वंदन केल्याशिवाय उज्जैनची तीर्थयात्रा कधीही पूर्ण मानली जात नाही. तंत्रशास्त्र आणि परंपरेनुसार, भक्त इथे भगवान काळभैरवाला चोवीस तास, वर्षाचे बाराही महिने मद्य अर्पण करतात. मंदिराचे पुजारी भक्तांनी आणलेले मद्य एका लहान ताटात ओततात. त्यानंतर, ते ताट बाबा काळभैरवाच्या मूर्तीच्या तोंडाजवळ ठेवले जाते. क्षणात, ताटातील सर्व मद्य नाहीसे होते. मूर्तीच्या तोंडाजवळ कोणतेही छिद्र किंवा नळी नाही, तरीही असे घडते. हे आजही मंदिराचे एक मोठे रहस्य आहे.
हेही वाचा :
Shani Dev: मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि ‘अशी’ भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)