टीव्ही अभिनेत्री हिना खान ही विविध सामाजिक आणि चर्चेतील विषयांवर आपली स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच पुण्यातील 26 वर्षीय केतन अग्रवालच्या मृत्यूचे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. सुरुवातीला ही घटना ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात मानली जात होती. मात्र, तपास पुढे सरकल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. होणारी बायको सियाने आपला प्रियकर चेतनच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
सिया नकार देऊ शकली असती – हिना खान
पुण्यातील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हिना खानने ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. हिना खानने म्हटले की, ‘आजच्या काळात सत्य ऐकणे आणि सत्य बोलणे इतके कठीण झाले आहे की लोक एखाद्याचा जीव घेण्यासही तयार होतात. सत्य स्वीकारण्यापेक्षा एखाद्याचे आयुष्य संपवणे सोपे वाटू लागले आहे. फक्त एक सत्य बोलून तू त्याला वाचवू शकली असतीस आणि तुझ्या पसंतीच्या व्यक्तीसोबत आयुष्य जगू शकली असतीस.’
समोर आलेल्या माहिकीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा डोंगरावरून पडल्यामुळे झालेला अपघात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर समोर आलेल्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणाचे स्वरूप बदलले. पोलिसांचा आरोप आहे की केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून या घटनेचा कट रचला होता.
नोव्हेंबरमध्ये होणार होते लग्न
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा यावर्षी साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे भव्य लग्न होणार होते. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारीही सुरू केली होती. लग्नापूर्वी दोघांचे बाली येथे प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मुंबई विमानतळावर केतनला त्याचा पासपोर्ट हरवल्याचे लक्षात आल्यानंतर हा दौरा रद्द झाला. त्यानंतर दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस तपासात धक्कादायक दावे
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार केतनला ठार मारण्याचा प्रयत्न त्याच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधीही करण्यात आला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. सखोल तपासानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.