IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला – Marathi News | IND vs ZIM First win since taking over T20 captaincy know what Shreyas Iyer reaction


IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
Image Credit source: BCCI

भारत झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल श्रेयस अय्यरच्या पदरात पुन्हा एकदा पडला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ते संघाच्या पथ्यावर पडलं. भारताच्या युवा गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. झिम्बाब्वेला 20 षटकात 125 धावांवर रोखलं. त्यामुळे भारतीय संघाला सोपं आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 13.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. यासह भारताने 7 गडी राखून झिम्बाब्वेवर विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. खरं तर या विजयामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाला नवसंजीवनी मिळाली आहे. कारण त्याने संघांची सूत्र हाती घेतल्यापासून पराभवाची मालिका सुरू होती. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली जात होती. पण अखेर या चर्चांना झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर पूर्णविराम मिळाला आहे. या विजयानंतर श्रेयस अय्यरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर या विजयानंतर म्हणाला की, ‘अप्रतिम. त्यांनी उत्कृष्ट खेळी केली. माझा पहिला विजय मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. मी खेळपट्टीच्या उसळीचा अंदाज घेत होतो आणि खेळपट्टीवर बऱ्यापैकी उसळी होती. मयंकने अप्रतिम सुरुवात करून दिली. त्यांना संधीच दिली नाही. वैभवने मैदानात उतरून आम्हाला फलंदाजीने उत्कृष्ट सुरुवात करून दिली. त्यांनी खेळपट्टीचा अंदाज घेऊन भागीदारी रचायला सुरुवात केली आणि तेव्हाच मला माझ्या गोलंदाजांनाही रोटेट करायचे होते.’ वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘तो निर्भय आहे, ज्या पद्धतीने तो डाव खेळतो ते अप्रतिम आहे. जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो.’

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा काय म्हणाला?

टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर सिकंदर रझाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिकंदर रझाने आपला सगळा राग खेळपट्टीवर काढत म्हणाला की, ‘मला वाटते की ती दर्जाला योग्य नव्हती. सकाळी, मला वाटते की आर्द्रतेचा निश्चितच परिणाम झाला, पण तो इतका वेळ टिकेल असे मला वाटले नव्हते. मला वाटले की नवीन चेंडूने खेळणे कठीण राहिले. दुर्दैवाने, आम्ही सुरुवातीला जास्त चौकार मारले नाहीत, त्यामुळे चेंडू नवीनच राहिला आणि त्यामुळे, खेळपट्टीवरून चेंडूच्या हालचालीमुळे फलंदाजी करणे आणखी कठीण झाले असे मला वाटले.’ सिकंदर रझा पुढे म्हणाला की, आज मला वाटले की पहिल्या आठ ते दहा किंवा अगदी 12 षटकांपर्यंतच आर्द्रता होती आणि त्याव्यतिरिक्त, जेव्हा भारत फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा खेळपट्टी खूपच अचूक होती. त्यामुळे, आशा आहे की पुढच्या सामन्यासाठी आम्हाला चांगली खेळपट्टी मिळेल, जेणेकरून नाणेफेक हरल्यावरही त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *