IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 


IND A vs SL A Cricket Updates : आयपीएलमधील (IPL) स्टार खेळाडूंचा भरणार असलेल्या भारत ‘अ’ संघाने तिरंगी मालिकेत (Try-Series) विजयी सलामी दिली. पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka A) जवळपास हरलेला सामना आपल्या गोलंदाजांच्या जोरावर शेवटच्या क्षणी फिरवून एका थरारक विजयाची नोंद केली. भारताने श्रीलंकेचा 9 धावांनी पराभव केला. 

भारताने दिलेल्या 278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत श्रीलंकेच्या संघाने 46 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 256 धावा कुटल्या होत्या. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या 24 चेंडूंमध्ये केवळ 22 धावांची गरज होती आणि त्यांचे नामांकित फलंदाज मैदानावर होते. अशावेळी भारताचा पराभव निश्चित मानला जात असतानाच, भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत श्रीलंकेच्या जबड्यातून विजय हिसकावून आणला.

Ruturaj Gaikwad Century : ऋतुराज गायकवाडचे शानदार शतक

भारतीय कर्णधार तिलक वर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग (2 धावा) आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (14 धावा) स्वस्तात बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला प्रियांश आर्या 32 धावा करून दुर्दैवीरीत्या रनआऊट झाला.

अव्वल फळी कोसळल्यानंतर अनुभवी ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) कर्णधार तिलक वर्माच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 150 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ऋतुराजने 114 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 101 धावांचे शानदार शतक ठोकले. तर तिलक वर्माने 97 चेंडूंत 60 धावांचे योगदान दिले.

शेवटच्या ओव्हर्समध्ये आयुष बडोनीने 18 चेंडूंत 24 धावा आणि महाराष्ट्राच्या सूर्यांश शेडगेने 14 चेंडूंत 26 धावांची वेगवान खेळी केल्यामुळे भारताने 50 ओव्हर्समध्ये 9 बाद 277 धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभा केला. 

Sri Lanka Inning : डिकवेला, अविष्काची 93 धावांची सलामी

भारताच्या 278 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या निरोशन डिकवेला (47) आणि अविष्का फर्नांडो (45) यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची धडाकेबाज भागीदारी केली. या दोन्ही धोकादायक ओपनर्सना आयुष बडोनीने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर विप्रज निगमने नुवाणिदु फर्नांडोला (8) बाद केले.

सदीरा समरविक्रमा (46) आणि कर्णधार सहान अरच्चिगे यांच्यातील 78 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंका विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. कर्णधार अरच्चिगेने 72 चेंडूंत 74 धावांची (6 चौकार, 2 षटकार) उत्कृष्ट खेळी खेळली. मात्र, तो 262 च्या स्कोअरवर बाद झाला आणि तिथूनच सामन्याचे चित्र पालटले.

Last 4 Overs Thriller : अंतिम 4 ओव्हर्समध्ये भारताचा चमत्कार!

जेव्हा श्रीलंकेला 24 चेंडूंत 22 धावा हव्या होत्या, तेव्हा भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि प्रभावी गोलंदाजी केली. धावा रोखण्यासोबतच भारताने लागोपाठ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला 16 चेंडूंत 16 धावांची गरज असताना भारताने सेट झालेला फलंदाज अरच्चिगेला बाद केले. शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत श्रीलंकेला लक्ष्यापासून रोखले आणि टीम इंडियाने हा सामना खिशात घातला.

ही बातमी वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *