आपल्या शरीराचे एकुण कार्य सुरळीत चालण्यासाठी हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि मेंदू यांसारखे अवयव खुप मेहनत घेत असतात. शरीरातील प्रत्येक अवयव दिवस-रात्र कार्यरत राहून आपल्याला निरोगी ठेवण्याचे काम करतो. शरीरात दररोज जुन्या पेशींची जागा नवीन पेशी घेतात, खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती होते आणि मग संसर्गांशी लढा दिला जातो. म्हणजेच, आपल्या शरीराकडे नैसर्गिकरीत्या स्वतःची दुरुस्ती करण्याची एक अद्भुत यंत्रणा असते.
वाढत्या वयानुसार किंवा दीर्घकालीन आजारांचा सामना करताना ही नैसर्गिक दुरुस्तीची प्रक्रिया हळूहळू कमकुवत होऊ लागते. आहाराच्या चुकीच्या सवयी, तणाव, प्रदूषण, विषारी घटक, संसर्ग आणि दीर्घकालीन आजार यांचा अवयवांवर हळूहळू परिणाम होत असतो. परिणामी हृदयरोग, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, सीओपीडी, पल्मोनरी फायब्रोसिस, तीव्र दमा, स्ट्रोकनंतरचे नुकसान आणि न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार यांसारख्या समस्या वाढू लागतात. अवयवांची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा, दम लागणे, सूज येणे, एकाग्रतेचा अभाव, पचनाच्या समस्या आणि दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपण हे आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्वात मोठा प्रगती मानली जाते. 1954 मध्ये जगातील पहिले यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आणि त्यानंतर लाखो रुग्णांना नवजीवन मिळाले. आजही अंतिम टप्प्यात अवयव निकामी झाल्यास प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार मानला जातो.
मात्र प्रत्यारोपणासमोर काही गंभीर आव्हाने आहेत. सर्वात मोठी समस्या म्हणजे दात्या अवयवांची कमतरता. प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या उपलब्ध अवयवांपेक्षा खूप जास्त आहे. याशिवाय प्रत्यारोपणानंतर शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा नव्या अवयवाला नाकारण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेक रुग्णांना आयुष्यभर विशेष औषधांवर अवलंबून राहावे लागते. प्रत्येक अवयवाचे आरोग्य हे त्यातील पेशींच्या आरोग्यावर अवलंबून असते. पेशींना ऊर्जा पुरवण्याचे महत्त्वाचे काम माइटोकॉन्ड्रिया करतात. माइटोकॉन्ड्रिया हे पेशींच्या ऊर्जेचे केंद्र मानले जाते.
वृद्धत्व, दाह, तणाव, प्रदूषण, विषारी पदार्थ आणि दीर्घकालीन आजारांमुळे माइटोकॉन्ड्रियाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. कालांतराने ऊतींचे नुकसान, जखमा भरून येण्याची प्रक्रिया मंदावणे आणि अवयवांची कार्यक्षमता कमी होते. संशोधनानुसार हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि मेंदूच्या दीर्घकालीन आजारांमध्ये माइटोकॉन्ड्रियल बिघाड हा महत्त्वाचा घटक आहे.
अशा परिस्थितीत रिजनरेटिव्ह मेडिसिन (Regenerative Medicine) हे एक आशादायी क्षेत्र म्हणून समोर येत आहे. या उपचारपद्धतीचा उद्देश शरीराची नैसर्गिक दुरुस्ती आणि पुनर्बांधणी प्रक्रियेला चालना देणे हा आहे. शरीरातील पेशी आणि ऊतींच्या पुनर्निर्मितीस मदत करून अवयवांची कार्यक्षमता सुधारण्याचा प्रयत्न केला जातो.
या क्षेत्रात लिव्हिंग ड्रग थेरपी, एक्सोसोम आणि सुपरचार्ज्ड एक्सोसोम थेरपी, तसेच माइटोकॉन्ड्रियल कार्यक्षमता सुधारण्यासाठी विविध उपचारपद्धतींचा वापर केला जातो. हे उपचार पारंपरिक औषधोपचारांना पूरक उपचार म्हणून वापरले जाऊ शकतात आणि दीर्घकालीन, दाहजन्य, वयोमानाशी संबंधित किंवा अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या आजारांमध्ये त्यांचा विचार केला जातो.
रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या बाबतीत अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की, हे उपचार अवयव प्रत्यारोपणाला पर्याय ठरू शकतात का? सद्यस्थितीत अवयव प्रत्यारोपण हे अनेक गंभीर रुग्णांसाठी जीवनरक्षक उपचार आहे. मात्र रिजनरेटिव्ह मेडिसिन क्षेत्रातही अवयवांचे नुकसान कमी करण्यास, त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यास आणि काही रुग्णांमध्ये प्रत्यारोपणाची गरज पुढे ढकलण्यास फायदेशीर ठरते तज्ज्ञांचे मत आहे.
वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आज अवयवांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत. रिजनरेटिव्ह मेडिसिन हे त्यापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र असून शरीराच्या नैसर्गिक पुनर्बांधणी क्षमतेचा उपयोग करण्यावर त्याचा भर आहे. मात्र कोणतेही उपचार निवडण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांचा विचार करणे गरजेचे आहे.
– डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण