Hardik Pandya Ruled OUT India vs Afghanistan ODI : भारतीय क्रिकेट संघाला आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे (ODI) मालिकेपूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पायाच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) मध्ये आठवडाभर फिटनेस टेस्ट आणि सराव केल्यानंतर त्याला खेळण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला होता, परंतु ऐनवेळी झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून माघार घ्यावी लागली आहे. बीसीसीआय (BCCI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक आता पुनर्वसनासाठी (Rehabilitation) बंगळुरूमध्येच थांबणार आहे.
ऐनवेळी दुखापत बळावली (Hardik Pandya suffers fresh injury setback)
‘हिंदुस्तान टाइम्स डिजिटल’शी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “हार्दिकने सुरुवातीला सर्व आवश्यक चाचण्या उत्तीर्ण केल्या होत्या आणि त्याला मंजुरीही मिळाली होती. पण ऐनवेळी त्याच्या क्वॉड्रिसेप्स (Quadriceps Strain – मांडीचे स्नायू) ला ताण आल्यामुळे तो अफगाणिस्तान मालिकेबाहेर झाला आहे. त्याला जवळपास दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.” हार्दिकच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, जुलै महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील त्याच्या सहभागावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रोहित शर्मा सज्ज, विराट कोहली बाहेर
दुसरीकडे, भारतीय वनडे संघाचे काही सदस्य मोहालीत एकत्र येतील आणि गुरुवारी धरमशालासाठी रवाना होण्यापूर्वी सराव करतील. कर्णधार रोहित शर्मा या मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार असून, त्याच्या जागी यशस्वी जैस्वालची संघात निवड करण्यात आली आहे.
आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरी
हार्दिक पांड्याने नुकतेच आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. या 19व्या हंगामात त्याला पाठीच्या त्रासामुळे (Back Spasms) काही सामन्यांना मुकावे लागले होते. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी राहिला, ज्यामुळे त्याच्या कर्णधारपदावर आणि फ्रँचायझीमधील भविष्यावर बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
2027 च्या वर्ल्ड कपसाठी हार्दिक महत्त्वाचा – अजित आगरकर
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, हार्दिकला 2027च्या वनडे वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त ठेवणे हे भारतीय संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणूनच त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. अजित आगरकर म्हणाले की, “हार्दिक हा वनडे संघाचा महत्त्वाचा भाग आहे. जसप्रीत बुमराहप्रमाणेच हार्दिकलाही वनडे क्रिकेटमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त पाहणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. यामुळे हार्दिकला विश्रांती मिळेल आणि नितीश रेड्डी सारख्या तरुण खेळाडूंना टी-20 मध्ये संधी देता येईल.”
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला