GK: भूक लागल्यावर इतका राग का येतो? यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? – Marathi News | Why do you get so angry when you are hungry Do you know the reason behind this


GK: भूक लागल्यावर इतका राग का येतो? यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?Image Credit source: Pexels

आपल्याला जगायचं म्हंटलं तर शरीराला अन्न आणि पोषक द्रव्ये मिळणं गरजेचं आहे. अन्न ही आपली पहिली मूलभूत गरज आहे. त्यानंतर इतर गरजा लागू पडतात. आपल्या पोटात वेळच्या वेळी अन्न पडलं तर आपल्याला सक्रिय आणि उत्साही राहण्यास मदत होते. अनेक जण काही काळ उपवास वगैरे करतात. पण उपवास सोडेपर्यंत मन अस्वस्थ असतं. उपाशी पोटी असताना काही जणांची नाहक चिडचिड होते. इतकंच काय तर दुसऱ्यांवर रागही काढला जातो. तुमचीही भूक लागल्यावर चिडचिड होते का? तुम्ही दुसऱ्यावर राग काढता का? असं वागण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत…

भूक लागल्यावर राग का येतो?

आपण उपाशी पोटी असलो की रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे आपली चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यावर, ग्लुकोजची पातळी सामान्य करण्यासाठी शरीर कॉर्टिसोल (एक तणाव संप्रेरक) आणि ॲड्रेनालाईन (धोकादायक परिस्थितीत सक्रिय होणारे संप्रेरक) स्रवते. दोन्ही संप्रेरक व्यक्तीमध्ये ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) अवस्था, म्हणजेच तणाव आणि रागाची स्थिती, निर्माण करतात. यामुळेच बहुतेक लोकांना भूक लागल्यावर राग येतो. शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्या मेंदूवर ताण येतो. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होतो. त्यामुळे उपाशी पोटी असताना राग येणं सहाजिकच आहे.

भूक लागल्यावर शरीरात कोणते बदल होतात?

भूक लागल्यावर चिडचिड होते आणि एखाद्या कामावर लक्ष केंद्रीत करणं कठीण होतं. डोकेदुखी किंवा, हृदयाची वाढलेली धडधड आणि झोप याचा मनस्थितीवर परिणाम होतो. अशा स्थितीत तुम्हाला अन्नाची गरज असल्याचे संकेत मिळतात. जर याकडे कानाडोळा केला तर या सवयीमुळे तुमच्या मनस्थितीत फरक पडत जातो आणि तुमचा स्वभाव चिडचिडा होतो. मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

ग्लुकोजच्या कमतरतेमुळे मेंदूचा भावना आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. अगदी लहानसहान गोष्टींवरील नियंत्रणही सुटते. त्यामुळे नियमितपणे थोडे थोडे जेवण घ्यावे आणि भूक लागताच पौष्टिक अन्न खावे. पौष्टिक अन्नामुळे तुम्हाला काही मिनिटांतच बरे वाटेल. भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही फळे किंवा सुकामेवा यांसारखे पौष्टिक पदार्थ खावेत. दर तासाला पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यासही मदत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *