Modi Cabinet Reshuffle: केंद्र सरकारमध्ये मोठा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल (Cabinet Reshuffle) होण्याची शक्यता आहे. हा विस्तार उद्या (30 जून) होईल, अशी वर्तवली जात आहे. या फेरबदलामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर काही अत्यंत धक्कादायक आणि नवीन चेहऱ्यांची एंट्री होऊ शकते. या फेरबदलात कामगिरीच्या आधारावर आणि राजकीय दबावामुळे काही बड्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राष्ट्रपती भवनातील लागोपाठच्या गाठीभेटींमुळे हा मंत्रिमंडळ विस्तार आता अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जात आहे.
किती मंत्र्यांची सुट्टी होऊ शकते?
- धर्मेंद्र प्रधान (केंद्रीय शिक्षण मंत्री): देशातील राष्ट्रीय प्रवेश परीक्षांच्या (NEET) कथित पेपर लीक वादामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आहे. त्यामुळे या फेरबदलात त्यांची मंत्रिमंडळातून सुट्टी होऊ शकते, असे मानले जात आहे.
- हरदीप सिंह पुरी (पेट्रोलियम मंत्री): हरदीप सिंह पुरी यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्ष संघटना किंवा अन्य जबाबदारीसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
किती नवीन चेहरे येऊ शकतात?
- शक्तिकांत दास (माजी गव्हर्नर, आरबीआय): रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव शक्तिकांत दास यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. त्यांना थेट मंत्रिमंडळात आणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
- श्रीकांत शिंदे (खासदार, शिंदे गट): महाराष्ट्रातून महायुतीचे समीकरण मजबूत करण्यासाठी आणि शिंदे गटाला योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे.
- अरुण गोविल (खासदार, भाजप): ‘रामायण’ फेम आणि मेरठचे नवनिर्वाचित खासदार अरुण गोविल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किती मंत्र्यांचे प्रमोशन होऊ शकते?
काही सध्याच्या मंत्र्यांनी आपल्या कामाची चमक दाखवली आहे, तसेच पक्षाच्या अंतर्गत गणितात त्यांचे स्थान मजबूत झाले आहे, अशा नेत्यांना प्रमोशन मिळू शकते
- अनुराग ठाकूर: भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना कॅबिनेट रँकमध्ये अधिक महत्त्वाचे स्थान दिले जाण्याची शक्यता असून, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांना अधिक मोठ्या भूमिकेत आणले जाऊ शकते.
- काही राज्यमंत्र्यांना (MoS) त्यांच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून स्वतंत्र प्रभार (Independent Charge) किंवा थेट कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे.
किती मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात?
सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सध्या मोठी जबाबदारी आहे, मात्र सूत्रांच्या हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास देशाचे नवे अर्थमंत्री बनू शकतात.धर्मेंद्र प्रधान यांच्या संभाव्य एक्झिटनंतर, शिक्षण खात्याची धुरा निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशीही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
याशिवाय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेल्या लागोपाठच्या बैठकांनंतर हे स्पष्ट झाले आहे की, अनेक बड्या मंत्रालयांच्या (उदा. पेट्रोलियम, उड्डयन, संरक्षण किंवा गृहनिर्माण) खात्यांमध्ये फेरबदल केला जाणार आहे. आगामी काळात होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवून प्रादेशिक आणि जातीय समीकरणे साधण्यासाठी हा फेरबदल केला जात आहे. विशेषतः ओडिशा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांना या विस्तारात अधिक महत्त्व मिळण्याची चिन्हे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा