Veen Doghatli Tutena:पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागली असून, वटपौर्णिमेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरही खास वातावरण पाहायला मिळणार आहे. वीण दोघांतली ही तुटेना आणि सनई चौघडे या मालिकांमध्ये वटपौर्णिमेचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एका बाजूला समर-स्वानंदीच्या नात्याला प्रेमाची नवी दिशा मिळणार आहे, तर दुसरीकडे आसावरी-गौतमच्या नात्यात रोमँटिक क्षणांसोबतच कथानकात मोठा ट्विस्टही पाहायला मिळणार आहे.
समरच्या प्रश्नाला स्वनांदीचं उत्तर?
‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये समर स्वानंदीसाठी खास सरप्राईज प्लॅन करताना दिसणार आहे. मोकळ्या माळरानावर फिरायला नेल्यानंतर तो तिला प्लांट नर्सरीमध्ये घेऊन जातो, जिथे फुलं आणि रोपांच्या मदतीने‘आई लव्ह यू’ लिहून आपल्या भावना व्यक्त करतो. मात्र, स्वानंदी अजूनही त्याच्या प्रेमाला उत्तर दिलेलं नसल्याने समर तिला स्पष्ट सांगतो की, “जर आपल्या नात्यात तसे काही नाही, तर वटपौर्णिमेची पूजा करू नका.” वटपौर्णिमेच्या दिवशी समर येणार की नाही, या विचारात असलेल्या स्वानंदीला सुखद धक्का बसतो, कारण समर आधीच वडाच्या झाडाजवळ उपस्थित राहून पूजा करताना दिसतो.

या विशेष भागाबद्दल अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, “मालिकेत ज्या महत्त्वाच्या टप्प्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि त्याचसोबत पावसाचीही आपण सगळे वाट पाहत होतो. या दोन्ही गोष्टी एकत्र येणं म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच होता. त्या सुंदर वातावरणात वटपौर्णिमेचा सीन शूट करताना खूप मजा आली. गेले तीन-चार महिने प्रचंड उष्णतेत शूटिंग सुरू होतं. त्यामुळे हा पावसाचा गारवा आणि ओलावा आम्हा कलाकारांसोबतच टेक्निशियनससाठीही खूप गरजेचा होता.”ती पुढे म्हणाली, “निसर्गाने इतकी सुंदर साथ दिली की सगळंच अगदी छान जुळून आलं. समर आणि स्वानंदी एकमेकांबद्दलच्या भावना कधी व्यक्त करणार आहेत, ते प्रेमात कधी पडणार, याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती.”

सनई चौघडे मालिकेतही जय- शर्वरीच्या नात्यातील खास क्षण
दुसरीकडे ‘सनई चौघडे’मध्ये वटपौर्णिमेचा खास सोहळा रंगणार असला, तरी या उत्सवात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जय खानोलकर एका संकटात अडकणार असून, शर्वरी त्याला कसं बाहेर काढते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर आसावरी आणि गौतम यांच्यातील रोमँटिक क्षणही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.


या भागाच्या शूटिंगबद्दल अभिनेत्री जुई गोगरी म्हणाली, “पावसाळ्यात शूटिंग करणं खरंच खूप आव्हानात्मक असतं. मी वसईहून ठाण्याला शूटसाठी प्रवास करते. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीच्या अनेक अडचणी येतात. रस्त्यांवर पाणी साचतं, लोकल ट्रेन उशिरा येतात.”ती पुढे म्हणाली, “पावसात शूटिंग करतानाचा अनुभव खूप सुंदर होता. आम्ही मनापासून हा भाग साकारला आहे आणि प्रेक्षकांना हे सर्व प्रसंग नक्की आवडतील, अशी आशा आहे.” वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रेम, भावना आणि नात्यांच्या नव्या वळणांनी सजलेले हे दोन्ही विशेष भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहेत. समर-स्वानंदीच्या प्रेमाची कबुली आणि आसावरी-गौतमच्या नात्यातील खास क्षण यामुळे येणारे भाग उत्सुकता वाढवणारे असतील.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष