Narendra Patil पुणे / मुंबई : भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिन्यू पवार यांच्यामध्ये पुण्यातील सारथीच्या कार्यक्रमात रांगेत बसण्यावरुन नाराजीनाट्य निर्माण झालं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सारथी’च्या वतीने आयोजित यूपीएससी,एमपीएससी व इतर उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पहिल्या रांगेत बसण्यावरुन निर्माण झालेल्या झालेल्या नाराजीनाट्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यातन नेमकं काय घडलं ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे.
तितक्यात ताई उठल्या आणि कॉन्ट्राव्हर्सी झाली : नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील म्हणाले की आज व्यासपीठावर सुनेत्रा पवार यांच्या बाजूला एक जागा रिकामी होती, त्याच्या बाजूला महापौर आणि सारथीचे अध्यक्ष बसले होते. अशा वेळेला खुर्ची मोकळी राहणं हे योग्य वाटत नव्हतं. मला अभिमन्यू पवार म्हणाले की नरेंद्र तू जाऊन पुढे बसं. खासदार कुलकर्णी ताई त्यांना मागच्या रांगेत खुर्ची होती तिथं बसल्या होत्या. तिथं खासदार सुप्रियाताई सुळे आल्या नव्हत्या म्हणून त्यांच्या जागेवर मी बसलो होतो. आम्ही मागच्या रांगेत आजूबाजूला बसलो होतो. पवार साहेबांनी मला सांगितलं की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे. सारथी आणि महामंडळ साहेबांनी वरती आणलंय, त्यामुळं पुढं जाऊन बसं. तितक्यात ताई उठल्या आणि कॉन्ट्राव्हर्सी झाली.
तसा कॉन्ट्राव्हर्सीचा विषय नव्हता. आता महामंडळाचा अध्यक्ष आहे जे मराठा समाजासाठी काम करतं. म्हणून मला अभिमन्यू पवारांनी पुढं जायला सांगितलं. मात्र, मी जायला मागत नव्हतो, कारण माझं कार्यक्रमपत्रिकेत नाव नव्हतं. सारथी आमची संस्था समजतो, साहेब येणारेत हे कळल्यानंतर स्वत: गावावरुन आलो. कॉन्ट्राव्हर्सी करण्याचा विषय नाही, हा ब्राह्मण आणि मराठा समाजाचा विषयच नाही. मेधाताईंचा कोण अनादर करु शकतो, ताई एवढ्या मोठ्या जुन्या संघाच्या, भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्याचबरोबर तिथं इतर समाजाची आमदार लोकं खुर्चीवर बसले होते, त्यांनी काही बोललं नाही.
कॉन्ट्राव्हर्सी करुन काय संदेश देणार : नरेंद्र पाटील
देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी केलं ते आजपर्यंत कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. आज ते सारथीच्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मराठा बांधवांनी अशा कर्तबगार मुख्यमंत्री जे बारा बलुतेदार, अठरा पगड जातींना घेऊन जातात यांचा सत्कार केला पाहिजे. मात्र आपण कॉन्ट्राव्हर्सी करुन काय संदेश देणार आहोत, आपण सगळी भाजपची मंडळी आहोत, एका विचारसरणीची मंडळी आहोत, काय संदेश देणार समाजात, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केला.
प्रवीण दरेकर काय म्हणाले?
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी हा काही चर्चेचा आणि वादाचा विषय नाही, असं म्हटलं. मेधाताई समंजस्य खासदार आहेत. तिथं प्रोटोकॉल, मानापमान हा विषय असता कामा नये, कारण मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतले आहेत. हा खरा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपण त्या ठिकाणी तमका पुढे, तमका मागे अशा प्रकारची चर्चा दुर्दैवी आहे. अभिमन्यू पवार अशा मानसिकतेचे नाहीत. काही गैरसमज आमच्या मेधाताईंचा झाला असेल तर तो दूर होईल, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस सर्व जाती धर्माच्या, सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन, स्वत: ब्राह्मण असून या पुरोगामी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात जपतात. मला वाटतं अशा प्रकारे त्याला वळण लावण योग्य नाही, असं दरेकर म्हणाले.
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!