कोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निवीर भरतीला तरुणाईचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून अग्निवीर (Agniveer) पदासाठी भरती निघताच उमेदवारांची मोठी गर्दी होते. सध्या शासनाने अग्निवीर भरतीची कुठलाही जाहिरात प्रसिद्ध केल्याचं पाहण्यात आलं नसलं तरी, बेळगावमध्ये अग्निवीरची भरती असल्याची अफवा पसरुन मोठा गोंधळ उडाला. राज्यभरातून आलेल्या उमेदवारांना निष्कारण त्रास सहन करावा लागला. त्यामुळे, यापुढे उमेदवारांनी इकडे येण्यापूर्वी खात्री करावी, माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
बेळगाव मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 27 जून ते 3 जुलै दरम्यान अग्निवीरची मेगा भरती अशी बातमी अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्याप्रमाणे शनिवार 27 जून रोजी महाराष्ट्रातून आणि अन्य ठिकाणाहून उमेदवार भरतीसाठी आले होते. पण, बेळगाव येथे आल्यावर अग्निवीर भरती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांना निराश होऊन परत फिरावे लागले. राज्यातील काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यामुळे आणि सामाजिक माध्यमावर या बातम्या व्हायरल झाल्यामुळे अग्निवीर भरतीसाठी मोठ्या संख्येने तरुण बेळगावमधील मराठा सेंटर येथे आले होते. या तरुणांना प्रवास खर्च, भोजन, लॉज इत्यादीसाठी निष्कारण भुर्दंड पडला. अग्निवीर भरतीबाबत चौकशी केल्यानंतर अशी कोणतीही भरती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, या सर्वच उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला.
तरुणांनी खात्री, विचारपूस करावी
देशाच्या सैन्य दलात दाखल व्हायचे म्हणून मनाशी स्वप्ने बाळगून आलेल्या तरुणांना चुकीच्या बातम्यामुळे निष्कारण मनस्ताप सहन करावा लागला. 27 जून ते 3 जुलै पर्यंत शारीरिक चाचणी आणि त्या नंतर सप्टेंबर महिन्यात लेखी परीक्षा होणार असे वृत्त काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या चुकीची बातमीमुले तरुणांना निष्कारण आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, अद्यापही बेळगावमध्ये काही तरुण अग्निवीरच्या भरतीसाठी येत आहेत. त्यामुळे, अशी कुठलीही भरती नसल्याने उमेदवारांनी इकडे येऊ नये, असे आवाहन त्यांना करण्यात येत आहे.
हेही वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!