Women’s T20 World Cup 2026: टीम इंडियाची क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी, 10 चेंडूत सोडले 4 झेलImage Credit source: GETTY IMAGES
आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जागा मिळवायची असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 138 धावांचं आव्हान ठेवलं. पण हे आव्हान आणखी कमी असू शकलं असतं. सुमार क्षेत्ररक्षणामुळे हे आव्हान वाढलं असंच म्हणावं लागेल. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध केलेल्या चुकांचा पाढा पुन्हा एकदा या सामन्यात भारतीय खेळाडूंनी वाचला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने फक्त 10 चेंडूत 4 झेल सोडले. इतकंच काय तर तीन झेल फक्त 4 चेंडूत सोडले. भारतीय खेळाडूंनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणाचं सर्वात सुमार प्रदर्शन केलं. या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 10 झेल सोडले. यात बांगलादेशविरुद्ध 4, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 3, पाकिस्तानविरुद्ध 2 आणि नेदरलँडविरुद्ध 1 झेल सोडला.
टीम इंडियाच्या खेळाडूंना झेल मिळेना!
- बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पहिला झेल तिसऱ्या षटकात सुटला. श्री चरणी टाकत असलेल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जुआरिया फिरदौसीने उत्तुंग फटका मारला. पण स्क्वेअर लेग असलेल्या यास्तिका भाटियाला झेल पकडता आला नाही.
- दुसरा झेल चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुटला. रेणुका सिंहच्या गोलंदाजीवर फिरदौसीने पुन्हा हवेत फटका मारला. पण यावेळी राधा यादवने झेल सोडण्याची चूक केली. डीप मिडविकेटला असलेल्या राधा यादवने सोपा झेल सोडला.
- तिसरा झेल पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुटला. यावेळी श्री चरणी गोलंदाजी करत होती. तिच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना चूक झाली. पण सोभना यादवने झेल सोडला.
- चौथ्या झेल नंदिनी शर्माने सोडला. या झेल श्री चरणीच्या चेंडूवरच सोडला. शॉर्ट थर्च मॅन असलेल्या नंदिनी फिरदौसीचा झेल पकडण्यात चूक केली आणि तिला जीवदान मिळालं.
- बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फिरदौसीला एकूण 3 जीवदान मिळाले. तर श्री चरणीच्या गोलंदाजीवर तीन झेल सोडले. फिरदौसीने या सामन्यात 31 चेंडूत 33 धावा करून बाद झाली. नंदिनी शर्माच्या गोलंदाजीवर तिची विकेट पडली.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 3 झेल सोडले
दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना भारताने गमावला. या सामन्यातही भारतीय संघाने तीन झेल सोडले होते. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मारिजाने कापचे तीन झेल सोडले. पहिला झेल दहाव्या षटकात नंदिनी शर्माने, दुसरा झेल 13व्या षटकात श्री चरणीच्या गोलंदाजीवर राधा यादवने आणि तिसरा झेल 17 व्या षटकात पुन्हा एकदा राधा यादवने सोडला.