Eknath Shinde On Aditya Thackeray: राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2026) सुरु आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात लक्षवेधीच्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांकडून किंवा राज्यमंत्र्यांकडून उत्तर मिळत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी हल्लाबोल केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या अखत्यारीत असलेले विभाग दुसऱ्या मंत्र्यांकडे सभागृहात उत्तर देण्यासाठी विभागून देतात. यावरुन आदित्य ठाकरेंनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. जी खाती रडून घेतली, त्या खात्याबाबत उत्तर द्यावं. फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर तसं लिहून द्यावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमच्या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी पळ काढला नाही की जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली नाही. जी खाती रडून घेतली त्याबाबत उत्तर द्यायला हवीत, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, अध्यक्ष हे खोटं बोलले ते रेकॉर्डवर गेलं आहे, हे रेकॉर्डवरून काढावं, असे आदित्य यांनी म्हटले. यानंतर आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी सभात्याग केला. आदित्य ठाकरे बाहेर जाताच काही क्षणात उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात पोहोचले. (Eknath Shinde On Aditya Thackeray)
एकनाथ शिंदे सभागृहात पोहोचताच काय घडलं? (Eknath Shinde On Aditya Thackeray)
एकनाथ शिंदे सभागृहात पोहोचताच मंत्र्यांनी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची माहिती दिली. यानंतर सभागृहात पोहोचताच कुठे गेले, तुमचे मित्र (आदित्य ठाकरे) कुठे आहेत?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी समोरच्या बाकांवर बसलेल्या विरोधकांना केला. तुमचे मित्र कुठे गेले, घरी गेले का? मी सभागृहात नव्हतो, मंत्र्यांनी मला सांगितलं. काल जो झटका लागला, त्यामुळे त्यांचं (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडलं आहे, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं.
मानसिक संतुलन बिघडले, आणखी झटके देणार-एकनाथ शिंदे (Eknath Shinde On Aditya Thackeray)
कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या वाया गेलास तू…विजयराव, जयंतराव तुम्ही ज्येष्ठ आहात, काय पोराटोरांचे (आदित्य ठाकरे) ऐकता, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला. थोड आत्मचिंतन करावं, जो शिशे के घर में रहते हैं वह दुसरों के घर पर पत्थर नहीं मारते हैं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. काल जोर का झटका दिला त्यामुळे त्यांचे (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
संबंधित बातमी:
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story