Last Updated:
बारवी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने एमआयडीसीने जिल्ह्यात आठवड्यातून तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अल निनोच्या प्रभावामुळे आणि मान्सून लांबल्याने ठाणे जिल्ह्यावर गंभीर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. त्यामुळे बारवी धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने एमआयडीसीने जिल्ह्यात आठवड्यातून तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
एमआयडीसीच्या परिपत्रकानुसार, दर बुधवार ते शुक्रवार या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय काही आठवड्यांत सलग 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित केला जाणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांसह औद्योगिक वसाहतींना याचा मोठा फटका बसणार आहे. बारवी धरणात सध्या केवळ 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत पुरेसा पाऊस पडून धरणे भरत नाहीत, तोपर्यंत ही पाणी कपात सुरूच राहणार आहे. पाऊस लांबला तर पुढील किमान दीड महिना ही परिस्थिती कायम राहू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम जिल्ह्यातील कंपन्यांवर होणार आहे. उत्पादनासाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. विशेषतः मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यांना पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार प्रशासन करत आहे.
त्यामुळे या कंपन्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते. नागरिकांनी आणि उद्योगांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे. पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होणार असून, पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे.
Thane,Thane,Maharashtra
