मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna hajare) यांनी फडणवीस सरकारला इशारा दिला असून 5 जुलै रोजी आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. माहिती अधिकार कायद्यात (RTI) 12 जून 2026 रोजी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शासनाने हे बदल पूर्ववत न केल्यास आपण उपोषण करणार असल्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटले. त्यातच, ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) पक्षातील खासदारांनी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अण्णांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे, तो पक्ष बदल करत नाही, असे म्हणत फुटीर खासदारांवर निशाणाही साधला.
माहिती अधिकार कायद्यात राज्यातील फडणवीस सरकारने काही बदल केले असून माहिती अधिकार मागणाऱ्या कार्यकर्त्यांना आता माहितीच्या प्रतिसाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे. यासह, एकूण 12 बदल करण्यात आले असून त्याविरुद्ध अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली. शुल्कवाढ, ओळखपत्राची सक्ती आणि “एक विषय–एक अर्ज” यांसारख्या तरतुदींमुळे माहितीचा अधिकार कमकुवत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत हे नियम तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.. दरम्यान मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याशी चर्चा झाली, दोन दिवसांनी ते आपल्याला भेटायला येणार आहेत, त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला तर ठीक अन्यथा 5 जुलैपासून राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशाराही अण्णांनी दिला आहे.
अण्णांची फुटीर खासदारांवर टीका
ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यावरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली. अशा पद्धतीने पक्ष बदल करणे हे बरोबर नाही, याचा अर्थ श्रद्धा नाही, निष्ठा नाही, ध्येयवाद नाही. ज्यांच्याकडे ध्येयवाद आहे, ज्याला वाटते मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे, तो पक्ष बदल करत नाही, असे म्हणत फुटलेल्या खासदारांवर अण्णा हजारेंनी निशाणा साधला. तसेच, स्वतःचे हित साधणारे लोक दल बदल करतात अशी टीकाही अण्णांनी यावेळी केली. दरम्यान, आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या पक्षातील सहा खासदारांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.
हेही वाचा
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story