BEST employees strike finally called off: बेस्टच्या आजी आणि माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांनी पुकारलेला आणि गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्याने आजच (21 जून) बसेस सुरु होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीच्या झालेल्या तासभराच्या बैठकीनंतर प्रमुख मागण्या मान्य झाल्याने हा निर्णय जाहीर करण्यात आला.
कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय
कर्मचाऱ्यांची थकीत ग्रॅच्युईटी रक्कम याच वर्षी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नवीन वेतन करार होईपर्यंत, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये आणि कंत्राटी कामगारांना दरमहा 2 हजार रुपये हंगामी वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत बेस्टला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यासाठी शासनाकडून योग्य ती पावले उचलली जातील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्यांची संख्या कमी असल्याने होणारा तोटा कमी करण्यासाठी, पुढील तीन वर्षांत 5 हजार नवीन इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) घेण्यात येणार आहेत.
5 हजार इलेक्ट्रीकल बसेस पुढील तीन वर्षांत घेणार
एकनाथ शिंदे म्हणाले की, बेस्टचा दोन दिवस संप सुरु होता. बेस्टची तूट लक्षात घेता सक्षमीकरण महत्वाचं आहे. बेस्टच्या डेपोंची दुरावस्था आहे यावर प्रकाश टाकला आहे. बेस्टची सर्व्हिस ही बेस्ट राहिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली आहे. प्रलंबित ग्रॅज्युईटी रक्कम या अर्थिक वर्षात देण्याचा निर्णय झाला आहे. स्वत:च्या गाडया असतील तर तोटा कमी हेईल. 5 हजार इलेक्ट्रीकल बसेस पुढील तीन वर्षांत घेणार आहोत. बेस्ट सक्षम करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. दरम्यान, संपावर भूमिका स्पष्ट करताना सचिन अहिर म्हणाले की, मुंबईकरांचे हाल व्हावे हा आमचा उद्देश नव्हता. आमचे प्रश्न आम्ही मांडले. बेस्ट वाचली पाहिजे हा उद्देश असून सरकारने दखल घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?