भारतीय दूरचित्रवाणीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणाऱ्या विनोदी मालिकांपैकी एक असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 17 हून अधिक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यापैकी ‘सुंदरलाल’ हे पात्र विशेष लोकप्रिय ठरले आहे. हे पात्र साकारणारे अभिनेते मयूर वकानी सध्या एका जुन्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
सोशल मीडियावर सध्या मालिकेतील एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सुमारे 11 वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या एका भागातील असल्याचे सांगितले जात आहे. या सीनमध्ये सुंदरलाल देशातील पेट्रोल-डिझेलची समस्या सोडवण्यासाठी एक मजेशीर आणि काल्पनिक उपाय सुचवताना दिसतो.
व्हिडिओमध्ये सुंदरलाल म्हणतो, मी देशातील सर्व रस्ते उताराचे बनवून टाकेन. त्यामुळे गाड्या न्यूट्रल गिअरमध्येच चालतील. गाड्या न्यूट्रलमध्ये चालल्याने पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल. परिणामी परदेशातून इंधनाची आयात कमी करावी लागेल. त्यामुळे डॉलरचा दर थेट 25 रुपयांवर येईल. आणि पुढील 15 वर्षांनंतर आपला एक रुपया त्यांच्या 15 डॉलरच्या बरोबरीचा होईल. या संवादातील अतिशयोक्तीपूर्ण कल्पना आणि विनोदी अंदाजामुळे हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या संवादाची गंमतीशीर तुलना केली.
काही नेटकऱ्यांनी सुंदरलालचे विचार गडकरींपेक्षाही पुढे गेले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी सुंदरने अफलातून कल्पना मांडली आहे, असे म्हणत विनोदाचा आनंद घेतला. आणखी एका म्हटले की हे गडकरींपेक्षाही जास्त अर्थपूर्ण वाटते अशी उपरोधिक टिप्पणी केली.
Now we know where Gadkari ji gets his inspiration pic.twitter.com/Z16KQu0KUL
— 🕷️KaliCharan (@_Kalicharan_) June 19, 2026
‘सुंदरलाल’ या पात्राबद्दल विशेष भावना
आपल्या लोकप्रिय भूमिकेबद्दल बोलताना मयूर वकानी म्हणाले की, प्रेक्षकांनी सुंदरलाल या पात्राला इतके प्रेम दिले आहे की ते आता एका आत्म्यासारखे झाले आहे. भगवद्गीतेत आत्मा फक्त शरीर बदलतो असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात एखादा दुसरा अभिनेता ही भूमिका साकारला तरी सुंदरलालचे मूळ स्वरूप आणि ओळख कायम राहील.