वीस वर्षांनंतर पवनराजे हत्याकांड खटल्याचा निकाल लागला आहे. या खटल्यातील आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे ओमराजेंनी आता वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, ओमराजेंनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बंडखोरी आणि ऑपरेशन टायगरबाबत मी नंतर निर्णय जाहीर करणार आहे. मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच मी माझा राजकीय निर्णय जाहीर करेन, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून ओमराजे यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही हे स्पष्ट होत आहे. ओमराजे यांच्या या विधानामुळे त्यांच्यासोबत फुटणाऱ्या पाच खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे. तसेच ऑपरेशन टायगरचा फियास्को होण्याची शक्यताही बळावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदार ठाकरे गटातून फुटल्याची चर्चा होती. ओमराजेंनीही निकाल लागल्यावर मी माझा निर्णय जाहीर करेन असं म्हटलं होतं. आज खटल्याचा निकाल आल्यानंतर ओमराजेंनी घुमजाव केलेलं दिसत आहे. मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतला नाही. मी राजकीय निर्णयाबाबत मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून बोलेन. मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. माझा राजकीय निर्णय मी मतदारांशी चर्चा करून जाहीर करेन, असं ओमराजे यांनी म्हटलं आहे. दोन दिवसात माझा निर्णय कळवेल, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
बैठकीला का गेले नाही?
तुम्ही शिवसेनेच्या बैठकीला का गेले नाही? व्हीप असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं. याबाबत विचारलं असता त्यावर त्यांनी कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा होता. मी कोणत्याच बैठकीला गेलो नाही. 16 तारखेला निकाल येणार होता. तो चार दिवसाने लांबला. त्यामुळे मी कुठेच गेलो नाही, असं सांगतानाच माझा राजकीय निर्णय दोन दिवसात घेईल. मतदारसंघात गेल्यानंतर मी सर्व बोलेन, असं ओमराजे यांनी स्पष्ट केलं.
पाचजणांची खासदारकी धोक्यात कशी?
ओमराजे निंबाळकर यांनी मी अद्याप राजकीय निर्णय घेतला नाही, असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ओमराजे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचं म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे ओमराजे यांच्या या विधानामुळे पाचही खासदारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ओमराजे माघारी फिरले आणि ठाकरेंसोबतच राहिले तर या पाचही खासदारांची खासदारकी जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. वेगळा गट स्थापन करण्यासाठी 6 खासदार हवेत. म्हणजे दोन तृतियांश खासदार फुटले पाहिजे. त्यातील एक खासदार जरी कमी असेल तर वेगळा गट स्थापन केला जाऊ शकत नाही. आता ओमराजे माघारी फिरले. तर पाचच खासदार उरतात. आणि ठाकरे गटाने बजावलेल्या व्हीपनुसार ठाकरे गट या पाचही खासदारांना बडतर्फ करण्याची शिफारस लोकसभा अध्यक्षांना करू शकतो आणि या खासदारांची खासदारकी जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं. शरद यादव केसचा दाखला देऊन ठाकरे गट या खासदारांना घरी पाठवू शकतो, असं सांगितलं जात आहे. मात्र, आता ओमराजे काय निर्णय घेतात यावर सर्व काही अवलंबून आहे.