Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतर मंतरजवळ विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये काल (23 जून) रात्री पुन्हा संघर्ष झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेसमधील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही आंदोलकांनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कनॉट प्लेसचे एसीपी विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यात आंदोलक काठ्या घेऊन पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहेत. हा संघर्ष सुमारे 15 मिनिटे चालला, पण त्यानंतर परिस्थिती सामान्य झाली आहे.
यापूर्वी, पंजाबी बागचे एसीपी जय प्रकाश हे देखील आंदोलकांच्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, एक दगड थेट त्यांच्या कपाळावर लागला. गुरुवारी सकाळी, दिल्लीतील 16 मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. ‘कॉकरोच जनता पार्टी’ 20 जूनपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. 20 जुलै रोजी, सीजेपीच्या संसद मोर्चादरम्यान संघर्ष झाला होता, ज्यात आंदोलक संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले होते. त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.
भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक
दिल्लीतील जंतर मंतरवर काॅकरोच जनता पक्षाचे आंदोलन सुरूच आहे. आजही हजारोंचा जमाव आहे. अभिजित दीपके यांनी आरोप केला आहे की, भाजप पुरस्कृत गुंड आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक करत आहेत. अभिजित दिपके म्हणाले की, जंतर मंतरवर महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे, पण अशी कोणतीही घटना घडली नाही. आता दगडफेकीद्वारे आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस स्वतःच तिथे दगडांनी भरलेले ट्रक आणत आहेत. दरम्यान, पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत झुरळ जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहील. रांका म्हणाले की, ते सरकारशी बोलण्यास तयार होते, पण सरकारने वेळकाढूपणा केला. आता जर त्यांना बोलायचे असेल, तर त्यांना जंतर मंतरवर यावे लागेल.
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपक यांनी सांगितले की, आज आमच्या आंदोलनाचा 34 वा दिवस आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 26 वा दिवस आहे. “आमचे आंदोलन असेच सुरू राहील आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही ते मागे घेणार नाही.” दरम्यान, दीपके यांनी सोनम वांगचुक यांना उपोषण संपवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की देशाला त्यांची गरज आहे. ते म्हणाले की पक्षाचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.
आजच्या 5 मोठ्या घडामोडी…
- केंद्र सरकारने दिल्लीत पश्चिम बंगालमधून 20 अतिरिक्त सीआरपीएफ कंपन्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून सुमारे 2000 सैनिक विमानाने आणण्यात आले.
- दिल्लीत सुरक्षेच्या कारणास्तव 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी सर्व स्टेशन पुन्हा सुरू झाली.
- सीजेपी आंदोलनादरम्यान आरएएफ जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही आंदोलक आरएएफ जवानाला मारहाण करताना, आरएएफच्या वाहनावर दगडफेक करताना आणि त्याची तोडफोड करताना दिसत आहेत.
- दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांवरील हल्ल्यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी घेतली. उच्च न्यायालयाने सरकारला हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे निर्देश दिले.
इतर महत्वाच्या बातम्या
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया