Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठलभक्त ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस… 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आषाढी एकादशी आणि भगवान विठ्ठल यांचे नाते अतूट मानले जाते. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येऊन भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणीचे दर्शन घेतात. त्यामुळे हा दिवस वारकरी संप्रदायासाठी वर्षातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो.. पण इथे अनेकांना प्रश्न पडतो की, विठुराया पंढरपुरात आला तरी कसा? एका पौराणिक कथेनुसार, भगवान विठ्ठल पंढरपूरला येण्यामागे एका भक्ताची अखंड मातृ-पितृसेवा हे प्रमुख कारण होते. जाणून घ्या…
भगवान विठ्ठल पंढरपुरात कसे आले? ही पौराणिक कथा जाणून घ्याच…(Ashadhi Ekadashi 2026)
प्राचीन काळी पुंडलिक नावाचा एक युवक आपल्या आई-वडिलांशी कठोर वागायचा. संसारातील सुखात रमल्यामुळे तो त्यांच्या सेवेकडे दुर्लक्ष करत असे. एकदा काही संत आणि ऋषींच्या सहवासामुळे त्याच्यात मोठा बदल झाला. आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, याची त्याला जाणीव झाली. त्यानंतर त्याने संपूर्ण आयुष्य आई-वडिलांच्या सेवेसाठी अर्पण केले. त्याची निष्ठा, समर्पण आणि भक्ती पाहून देवताही प्रभावित झाल्या.
भक्त पुंडलिकाच्या या अद्वितीय भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण (भगवान विष्णू) त्याला दर्शन देण्यासाठी द्वारकेतून पंढरपूरला आले, असे सांगितले जाते. त्या वेळी पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की, त्याने देवाला त्वरित भेटण्यासाठीही सेवा सोडली नाही. त्याऐवजी त्याने जवळ पडलेली एक वीट भगवानांकडे फेकली आणि नम्रपणे म्हणाला, “प्रभू, कृपया या विटेवर उभे राहून थोडी प्रतीक्षा करा. मी आई-वडिलांची सेवा पूर्ण करून तुमच्या दर्शनाला येतो.”
भगवानांनी पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचा आदर केला. ते त्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले. काही वेळाने पुंडलिकाने सेवा पूर्ण केली आणि भगवानांचे दर्शन घेतले. त्याने भगवानांना विनंती केली की, “प्रभू, आपण याच ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करा, जेणेकरून सर्व भक्तांना तुमचे दर्शन घेता येईल.”
पुंडलिकाची विनंती भगवानांनी मान्य केली आणि ते पंढरपूरमध्ये विठ्ठल या रूपात स्थायिक झाले, अशी श्रद्धा आहे. “विठ्ठल” या नावाबाबतही अशी लोकमान्यता आहे की, “वीट” आणि “स्थळ” या शब्दांपासून “विठ्ठल” हे नाव रूढ झाले. या नावाच्या उत्पत्तीबाबत विद्वानांची विविध मते आहेत.
आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभी असल्याचे दिसते. ही मूर्ती भक्त पुंडलिकाच्या भक्तीची आणि मातृ-पितृसेवेच्या महत्त्वाची कायम स्मरण करून देते. म्हणूनच वारकरी संप्रदायात “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” हा जयघोष विशेष महत्त्वाचा मानला जातो.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. त्यांच्या दृष्टीने विठ्ठल हा केवळ देव नसून, भक्तासाठी वाट पाहणारा, प्रेमाने उभा असलेला आणि भक्तीला सर्वश्रेष्ठ मानणारा परमेश्वर आहे. त्यामुळे पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नसून, भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक मानले जाते.
हेही वाचा :
Kalki Puran: सावधान, कलियुगाचा अंत व्हायला ‘इतका’ वेळ शिल्लक? भगवान कल्कि कधी घेणार अवतार? कल्कि पुराणातील रहस्य जाणून व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)