पुणे: राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आगामी ४ ते ५ दिवसांत कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून या भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची मोठी तूट (Deficiency) नोंदवण्यात आली असून नंदुरबारमध्ये पावसाचे प्रमाण तब्बल -७६ टक्क्यांपर्यंत खालावले आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
Rain Update: कुठे कसा असणार पाऊस? (पुढील ४ ते ५ दिवसांचा अंदाज)
कोकण आणि घाटमाथा: किनारपट्टीवरील जिल्हे आणि घाटमाथ्यावर पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस अपेक्षित असून या भागात ऑरेंज अलर्ट राहील.
विदर्भ: पूर्व विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाडा व मध्य महाराष्ट्र: पर्जन्यछायेच्या प्रदेशांमध्ये हवामान ढगाळ राहील. सर्वदूर मुसळधार पाऊस न होता, केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.
Rain Update: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची भीषण तूट
१ जूनपासून आजपर्यंतच्या पावसाची जिल्हानिहाय आकडेवारी पाहता, मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हे, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यानुसार पावसाची तूट
नंदुरबार: -७६%
हिंगोली: -५९%
लातूर: -४४%
अकोला: -४१%
परभणी: -४०%
याशिवाय धुळ्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ही तूट ३० ते ४० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
Rain Update: मान्सून असूनही पाऊस का गायब?
सध्या मान्सून सक्रिय आहे; परंतु अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र किंवा कोणतीही मोठी हवामान प्रणाली (Weather System) सक्रिय नाही. त्यामुळे ढग जमा होऊनही सार्वत्रिक असा मुसळधार पाऊस पडत नाहीये, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, ‘एल निनो’चा प्रभाव जूनपासूनच सुरू झाला आहे. मात्र, चार-पाच दिवसांच्या पावसावरून एल निनोचे विश्लेषण करता येत नाही. मान्सूनच्या उर्वरित दोन महिन्यांत आणि संपूर्ण हंगामाच्या शेवटी एल निनोचा एकूण परिणाम अधिक स्पष्ट होईल, असेही डॉ. सानप यांनी सांगितले. येत्या काळात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी त्यानुसारच पुढील नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Rain Update: पुढील पाच दिवस कुठे काय अलर्ट?
21 जुलै – मुंबई, पालघर, ठाणे,रायगड, पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
पालघर,नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ,वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
22 जुलै- पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी रायगड ठाणे, पालघर जिल्ह्यांसह नाशिक सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
23 जुलै – तळ कोकणासह संपूर्ण कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक व कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट असून जळगाव,अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे.
24 जुलै – ठाणे रायगड रत्नागिरी पुणे व सातारा घाटमाथा व गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
25 जुलै – रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर गेलो अलर्ट देण्यात आला असून महाराष्ट्रभरातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील किनारी भाग आणि लगतच्या घाट परिसरात पुढील 2 ते 3 दिवस वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर कायम राहील. पुढील 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो.
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं