दिल्लीत जंतरमंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी येत्या २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिल्ली पोलिसांनी तरुण आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला आहे. दिल्लीत जनरल डायर पुन्हा जिवंत झाला आहे अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. नीटची पुन्हा परीक्षा घेण्यात आली असली तरी त्यात अनेक चुका आहेत. शिक्षा झाली की दृष्टिकोन मिळतो, मात्र सरकारची तशी मानसिकता दिसत नाही. आरएसएस लोकशाही मानत नाही. ते ठोकशाहीवर विश्वास ठेवतात असेही प्रकाश महाजन यांनी यावेळी आरोप करताना म्हटले आहे.
जनआंदोलन हे असे आंदोलन आहे, ज्याला भले भले डायर घाबरतात, विरोधकांना आव्हान आहे त्यांनी हे आंदोलन देशभरात केले पाहिजे. सर्वसामान्य जनतेचा राग बाहेर आला पाहिजे असेही प्रकाश आंबडेकर यावेळी म्हणाले.
सरकारच आंतकवादी आहे
सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत झालेले नीट पेपर फुटी प्रकरणातील आंदोलक हे आंतकवादी असल्याची टीका केली आहे, याबाबत प्रतिक्रिया विचारली असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की हे सरकारच आंतकवादी आहे. मुंबईतील आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते बेकायदेशीर आहे. हे कोर्टात टिकणार नाही असाही दावा त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र २३ जुलै रोजी होणारा ‘ महाराष्ट्र बंद’ हा अत्यंत शांततेत असणार आहे. या बंदमध्ये बेस्ट, कर्मचारी, टॅक्सीवाले, व्यापाऱ्यांनी एक दिवस व्यवसाय बंद करुन पाठींबा द्यावा असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.