रोहित शर्माच्या 138 धावांच्या खेळीने त्याच्या निवृत्तीबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर, लॉर्ड्सवर होणारा आगामी एकदिवसीय सामना रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, असे वृत्त समोर आले होते. मात्र, त्याच्या शतकामुळे या चर्चा आता शमल्या आहेत. रोहितने एक दोन सामन्यात धावा केल्या नाही की लगेच त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरतात. आता मात्र रोहितने शानदार शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती बंद केली. रोहितच्या शतकानंतर सर्वत्र त्याचे कौतुक झाले. अशातच रोहितच्या शतकानंतर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने ‘हिटमॅन’साठी एक हृदयाला भिडणारा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी रोहितच्या टीकाकारांना सडेतोड उत्तरही दिले आहे. मोहम्मद कैफने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने रोहित शर्माच्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. कैफ म्हणाला, “निवृत्ती घेतली का? रोहित शर्मा स्वतःच्या निवृत्तीचा निर्णय घेईल. स्वत:चे नाक कापून घेतलात ना? त्याने भारतासाठी जे काही केले आहे, यानंचर त्याला स्वत: ला पात्र करावा लागायला नको खरं तर. 12,000 धावा, 34 शतके. जोपर्यंत तो कर्णधार होता, त्याने भारताला कधीही हरू दिले नाही. त्याला कोणताही त्रास झाला नाही, व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये त्याला कोणीही हरवू शकले नाही. असे होते त्याचे कर्णधारपद.”
Highest score by an indian batter at Lord’s. pic.twitter.com/oZCI9f0QUx
— Mohammad Kaif (@MohammadKaif) July 20, 2026
भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने पुढे आपले मत व्यक्त केले की, “जर रोहित दबावाखाली शतक करू शकतो, तर त्याला कर्णधार आणि बीसीसीआयचा पाठिंबा मिळाल्यास तो काय करू शकतो. इतका दबाव असतो की, प्रत्येकजण म्हणतो, ‘भावा, आता पुरे झाले, तू निवृत्त व्हायला पाहिजे. त्याने लॉर्ड्सवर त्या दबावाखाली शतक झळकावले. आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाने लॉर्ड्सवर एकदिवसीय सामन्यात शतक केलेले नाही. आता जर शुभमन गिल म्हणाला, “मला 2027 च्या विश्वचषक संघात रोहित भाई हवा आहे, आणि बीसीसीआय येऊन म्हणाली, कोणीही रोहितकडे बोट दाखवू नये, तर तो माणूस हिमालय चढेल. तो अशाप्रकारे खेळत भारतासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देईल. आम्हाला आमचे उत्तर मिळाले आहे. मला वाटते की येथून पुढे सर्वजण शांतता राखतील.”
रोहित शर्मा सप्टेंबरमध्ये पुन्हा मैदानात उतरणार आहे. वेस्ट इंडिज संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. नियोजित वेळापत्रकानुसार, पहिला सामना 27 सप्टेंबरला, दुसरा 30 सप्टेंबरला आणि शेवटचा एकदिवसीय सामना 3 ऑक्टोबरला खेळला जाईल.