महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवीन टि्वस्ट येऊ शकतो, तशी शक्यता दिसू लागली आहे. राजकीय पटलावर पुन्हा एकदा वेगवान गतीने घडामोडी घडतायत. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात दोन प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या. शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये येणार आहे आणि महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद कोणाला मिळणार?. मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत. त्या बाबत शरद पवार आमदार, खासदारांची मत जाणून घेत आहेत, अशी माहिती आहे. काल रात्री अचानक पटेल, तटकरे आणि पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार अशा चर्चा सुरु झाल्या.
तिन्ही नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यातच आहे. पण त्यावरुन विविध तर्क-वितर्क लावले जात आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीवर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, “ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी भेट झाली नाही” आता पडद्यामागे नेमकं काय राजकारण घडतय हे काही दिवसात स्पष्ट होईलच.
शरद पवार एनडीएसोबत येणार असतील, तर काय मिळणार?
महाराष्ट्राच अर्थखातं हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे होते. पण अजितदादांच्या अकाली निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते खातं आपल्याकडे घेतलं. आता सुनेत्रा पवारांकडून अर्थखात्याची मागणी होत आहे. त्या संदर्भात पटेल आणि तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत. त्याचवेळी शरद पवार एनडीएसोबत येणार असतील, तर काय मिळणार? हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. जयंत पाटील यांच्याकडे अर्थखात्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी महाराष्ट्राचं कित्येक वर्ष अर्थमंत्री संभाळलं आहे. त्यामुळे शरद पवार एनडीएमध्ये येणार असतील, तर अर्थमंत्री पदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. पण सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीने अर्थमंत्री पदावरील दावा सोडलेला नाही.