वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले; 18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश


मुंबई : नेहमीप्रमाणे संध्याकाळी फेरफटका मारुन घरी परतल्यानंतर लोअर परळ येथील 75 वर्षीय भगवानी सिंग यांच्यासोबत अवघ्या काही क्षणांतच भीषण अपघात घडला. घराच्या दोन खिडक्यांमधून आलेल्या जोराच्या वाऱ्याने जड दरवाजा अचानक बंद झाला आणि त्यात त्यांचा हात अडकला. या अपघातात त्यांच्या तर्जनीचे (इंडेक्स फिंगर) बोट जवळपास पूर्णपणे तुटले, तर शेजारच्या बोटालाही गंभीर दुखापत झाली.

हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा एकदा जोराच्या वाऱ्यामुळे दरवाजा बंद झाला आणि त्यांच्या कपाळालाही मार लागला. या दुखापतीमुळे कपाळावर टाके घालावे लागले. या अपघातानंतर सुमारे 18 तासांनी मुंबईतील ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ येथील मायक्रोसर्जरी तज्ज्ञांच्या टिमने त्यांच्या तुटलेल्या बोटाची यशस्वी पुनर्जोडणी केली.

बोट पुन्हा जोडण्याचा निर्णय

डॉ. कुशल शाह(हात, मनगट, ब्रॅकिअल प्लेक्सस आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन) यांनी सांगितले की, दरवाज्यात हात अडकल्याने महिलेच्या बोटाचे मधल्या हाडाचा चुराडा  झाला होता. सुरुवातीला कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रगत केंद्राचा शोध घेत त्यांनी परळच्या ग्लेनईगल्स हॅास्पीटलकडे धाव घेतली. दुखापत होऊन बराच वेळ उलटल्याने शस्त्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरली. रुग्णाचे वय, दुखापतीचे स्वरूप आणि तुटलेल्या बोटाची स्थिती यांचा सखोल आढावा घेतल्यानंतर तसेच कुटुंबीयांना संभाव्य धोके समजावून सांगून बोट पुन्हा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हाताच्या बाबतीत शक्य तितकी लांबी, संवेदना आणि कार्यक्षमता टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. पिरगत उपचार आणि  तज्ज्ञांच्या मदतीने वृद्ध रुग्णांमध्येही बोटाची पुनर्जोडणी ही कायमस्वरूपी बोट काढून टाकण्यापेक्षा अधिक चांगले कार्यात्मक आणि मानसिक परिणाम देऊ शकते.

तुटलेल्या बोटात 18 तासांनी पुन्हा रक्तपुरवठा

डॉ. शाह यांनी प्रथम तुटलेल्या हाडांची योग्य प्रकारे जुळवाजुळव करून ते स्थिर केले. त्यानंतर वाकवणारे आणि सरळ करणारे स्नायूंचे स्नायुबंध (टेंडन्स) अत्यंत काळजीपूर्वक जोडले, ज्यामुळे पुढील मायक्रोसर्जरीसाठी आवश्यक मजबूत आधार तयार झाला.यानंतर प्लास्टिक व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. राघव मागो यांनी ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने बोटातील सूक्ष्म धमन्या आणि शिरा पुन्हा जोडल्या. दुखापतीनंतर जवळपास 18 तासांनी तुटलेल्या बोटात पुन्हा रक्तपुरवठा सुरू करण्यात त्यांना यश आले.
 
डॉ. मागो म्हणाले की, बोटामध्ये पुन्हा रक्ताभिसरण सुरू करणे हा या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात आव्हानात्मक टप्पा होता.या रुग्णाला अनियंत्रित मधुमेह होता आणि अनेक वर्षांपासून तंबाखू चघळण्याची सवय होती. या दोन्ही गोष्टींमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड आला होता, जखम भरून येण्यास विलंब होत असल्याने रक्ताच्या गाठी, संसर्ग तसेच इतर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.

बोटाची पुनर्जोडणीसंदर्भात डॉक्टर म्हणाले..

तज्ज्ञांच्या मते, धारदार वस्तूमुळे बोट तुटण्यापेक्षा दरवाज्यात अडकून ते चिरडल्यामुळे झालेल्या दुखापतीत धमन्या, शिरा, मज्जातंतू आणि आजूबाजूच्या मऊ ऊतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यातच उशिरा उपचार आणि इतर आजारांमुळे गुंतागुंतीची शक्यता अधिक होती . उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, बोटाची पुनर्जोडणी केवळ बोट वाचवण्यासाठी केली जात नाही. बोटाची लांबी, स्पर्शज्ञान, पकडण्याची क्षमता आणि हाताचे नैसर्गिक कार्य टिकून राहिल्यास, विशेषतः वृद्ध व्यक्तींना दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करण्यास मोठी मदत होते आणि त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होते.
 
डॉक्टरांनी सांगितले की, केवळ वाढते वय हे बोटाची पुनर्जोडणी न करण्याचे कारण ठरू नये. दुखापतीचा प्रकार, रक्तपुरवठा खंडित झालेला कालावधी, रुग्णाच्या अपेक्षा आणि इतर आजारांचा विचार करून प्रत्येक रुग्णाचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.डॉ. शाह म्हणाले, आधुनिक मायक्रोसर्जरीमुळे पूर्वी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आज शक्य होत आहेत. मधुमेह नियंत्रणात ठेवणे, तंबाखूचे सेवन टाळणे आणि बोट तुटल्यास तातडीने तज्ज्ञांकडे उपचारासाठी जाणे तितकेच महत्त्वाचे आहे.या घटनेमुळे हाताच्या गंभीर दुखापती झाल्यानंतर रुग्णाला त्वरित रुग्णालयात रुग्णाला दाखल करणे, तुटलेला अवयव योग्य पद्धतीने जतन करणे आणि वेळीच मायक्रोसर्जरी करणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा उपचार करणाऱ्या टिमने व्यक्त केली.

गंभीर दुखापतींमधूनही रुग्ण पूर्णपणे सावरू शकतो

रुग्णाची नात दीक्षा सिंग म्हणाली, हे सर्व काही क्षणांत घडले. आजी नेहमीप्रमाणे फिरून घरी आल्या होत्या आणि चप्पल काढत असतानाच वाऱ्यामुळे दरवाजा जोरात बंद झाला. इतक्या साध्या घटनेमुळे इतकी गंभीर दुखापत होईल, याची कल्पनाही नव्हती. आम्हाला त्यांचे बोट कायमचे गमवावे लागेल अशी भीती वाटत होती. मात्र डॉक्टरांनी केवळ त्यांचे बोट वाचवले नाही, तर त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने स्वतंत्र आयुष्य जगण्याची संधी दिली. ग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. बिपिन चेवले म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि वेळीच मिळालेल्या उपचारांची सांगड घातल्यास अत्यंत गंभीर दुखापतींमधूनही रुग्ण पूर्णपणे सावरू शकतो. अशा उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच अशा प्रकारणांमध्ये वेळीच व उत्तम दर्जाचे उपचार पुरवण्यास हा आमचा मुख्य उद्देश आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *