मोठी बातमी! पहाटे शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा शरद पवारांबाबत खळबळजनक गौप्यस्फोट – Marathi News | What exactly happened the day after the early morning swearing in ceremony big NCP leaders make sensational revelations regarding Sharad Pawar


शरद पवारांबद्दल मोठा गौप्यस्फोट Image Credit source: टीव्ही 9 मराठी

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अचानक शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर तर चर्चेला आणखी उधाण आलं. शिवसेना ठाकरे गटाकडून या भेटीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटेचा शपथविधी घडवून आणला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार फार काळ टिकू शकलं नाही. यावर बोलताना अनिल पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले? 

2014  मध्ये शरद पवार यांनी भाजपला समर्थन दिले होते, मात्र ते काही दिवसांमध्ये मागे घेतले. 2017 मध्ये शिवसेनेला बाजूला करून भाजपसोबत सत्तेत जाण्याची चर्चा झाली होती, मात्र शेवटच्या क्षणी ती थांबली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीची सर्व कल्पना शरद पवार यांना होती, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःला बाजूला केले. 2023  मध्ये एकनाथ शिंदे यांच्या एक महिना अगोदर आम्हीही सत्तेत जाणार होतो, याचीही कल्पना कदाचित शरद पवार यांना होती, मात्र त्यावेळी तो निर्णय थांबला. असा गौप्यस्फोट अनिल पाटील यांनी केला आहे.   या सर्व प्रक्रियामुळे  भाजप आणि एनडीएमध्ये विश्वासार्हता कमी झाली आहे, असे कुठेतरी वाटते. ज्या दिवशी शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होतील, तो दिवस खरा समजावा, असंही यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. – लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून संभ्रम पसरवला जात आहे.  आमच्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ही योजना बंद पडू देणार नाहीत. ज्या महिलांची नावं या योजनेतून वगळ्यात आली आहे, त्या महिलांची नावे एक तर दोन ठिकाणी असतील किंवा त्यांनी केवायसी पूर्ण केली नसेल असंही यावेळी अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *