Last Updated:
Smart Meter: वीजबिल वाढण्यामागे स्मार्ट मीटरमध्ये कोणताही दोष नसून वाढलेला वीज वापर आणि आपल्याकडील ‘टेलिस्कोपिक’ वीज दरवाढ पद्धत कारणीभूत असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुंबई: राज्यभरात सध्या स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. स्मार्ट मीटरमुळेच बिलं वाढली आहेत, असा सूर सर्वसामान्यांमधून उमटत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामागील खरं कारण स्पष्ट केलं आहे. वीजबिल वाढण्यामागे स्मार्ट मीटरमध्ये कोणताही दोष नसून वाढलेला वीज वापर आणि आपल्याकडील ‘टेलिस्कोपिक’ वीज दरवाढ पद्धत कारणीभूत असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी 1 बीएचके आणि 2 बीएचके घरांच्या वीज वापराचं गणित समजावून सांगितलं.
यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे घराघरांमध्ये विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन उदाहरणांद्वारे ही दरवाढ कशी झाली ते उलगडून सांगितले आहे. साधारण १ बीएचके घरात साधारणपणे दीड टनाचा एसी, एक फ्रीज आणि पंखे असतात. अशा घरांचे नेहमीचे बिल साधारण 270 युनिट्स पर्यंत येत होते. मात्र यंदाच्या प्रचंड उकाड्यामुळे याच घरात यंदा 270 ऐवजी 415 युनिट्स वीज वापरली गेली. यामुळे मासिक बिल थेट अडीच हजार रुपयांवरून 5000 रुपयांवर गेले. तर 2 बीएचके घरात सरासरी वीज वापर ४२५ युनिट्स च्या आसपास असतो. उन्हाळ्यामुळे हा वापर वाढून थेट 655 युनिट्स वर पोहोचला. युनिट्स वाढल्यामुळे नेहमीचे 4500 रुपयांचे बिल थेट 8000 रुपयांवर गेले.
बिल दुप्पट का झाले?
वीज वापर थोडा वाढला तरी बिल थेट दुप्पट का होते? यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील ‘टेलिस्कोपिक’ वीज दर रचना समजून सांगितली. आपल्याकडे विजेचा वापर जसा वाढतो, तसा प्रति युनिटचा दरही टप्प्याटप्प्याने महाग होत जातो. 300 युनिटपर्यंत सरकार सर्वसामान्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देते. मात्र वीज वापर 300 युनिटच्या वर जाताच, प्रति युनिट दरात थेट 5 रुपयांची वाढ होते. वापर 500 युनिटच्या वर गेल्यास, दरात आणखी २ रुपयांची वाढ होते. यामुळेच, 1 बीएचकेमध्ये 300 ची मर्यादा ओलांडून 415 युनिट वापर केल्यामुळे आणि 2 बीएचकेमध्ये 500 ची मर्यादा ओलांडून 655 युनिट वापरल्यामुळे बिलाची रक्कम थेट दुप्पट झाली.
नेमकं कारण काय?
त्यामुळे वाढलेल्या बिलांचा आणि स्मार्ट मीटरचा कोणताही संबंध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. ज्या भागांमध्ये अजून स्मार्ट मीटर बसवलेले देखील नाहीत, तिथेही नागरिकांना अशीच वाढीव बिलं आली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यंदाचा वाढलेला उन्हाळा आणि हीट वेव्हमुळे एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर जास्त वेळ करावा लागल्याने ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर नाही त्यांचही वीज बिलं वाढल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
हे ही वाचा :
Mumbai,Maharashtra
